मुंबई : मुंबईत 30 जून रोजी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चेंबूर पश्चिमेकडील डायमंड गार्डनजवळील रोड नं. 11 वरील हरीताज प्रीतम इमारतीजवळ मोठी दुर्घटना घडली.
रस्त्याच्या कडेला असलेले पिंपळाचे झाड मुळासकट उन्मळून रस्त्यावरुन जाणाऱ्या युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर पडला. या बसमध्ये 13 विद्यार्थी होते. त्यापैकी 12 मुले जखमी झाले. त्यांना तात्काळ मुंबई अग्निशमन दल, बसवाहक, स्थानिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. यातील 5 विद्यार्थ्यांपैकी चौघे किरकोळ जखमी झाले होते. तर विहान श्रीवास्तव (वय 11) हा गंभीर असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि वातावरण बदलून गेले. शिवाय आणखी एक विद्यार्थी अडकला होता. त्याची मोठ्या मुश्कीलीने सुटका करण्यात आली. या निमित्ताने मुंबईतील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. तीन वर्षांत झाडे पडून किंवा त्यांच्या फांद्या पडून 13 जणांचा मृत्यू झाला आणि 125 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
चौकशी समिती
या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे आणि उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांची समिती नियुक्त 30 जून रोजीच नियुक्त केली. या समितीने 8 दिवसांत संपूर्ण तपास करून महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना अहवाल सादर करायचा आहे.
स्थायी समितीत गदारोळ
चेंबूरची दुर्घटना लक्षात घेऊन महापालिकेने झाडांचे ऑडिट करावे. तसेच, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी दुसऱ्या दिवशी (1 जुलै) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. ही बैठक लक्षणीय ठरली. सर्व सदस्य चेंबूरमधील दुर्घटनेमुळे संतप्त झाले होते. यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत चुकीला माफी नको, असे म्हणत जबाबदार अधिकारांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशीच मागणी आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनीही केली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी झाडांच्या तज्ज्ञांच्या मदतीने मुंबई सर्वेक्षण करण्याची मागणी केली. अशीच मागणी श्रद्धा जाधव यांनीही केली. या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची, निलंबनाची तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली होती.
निलंबनाची कारवाई
या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेविरोधात लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. समिती नियुक्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी (1 जुलै) रात्री उशिरा तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. यात महापालिकेने उद्यान आणि वृक्ष विभागाचे सहाय्यक अधीक्षक जगदीश भोईर, महापालिकेच्या रस्ते विभागातील उप अभियंता अरुण मुंडे आणि सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांचे निलंबन केले. शिवाय दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाचा ठपका आणखी दोन अधिकाऱ्यांवर ठेवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
दुर्घटना झालेल्या वृक्षाविषयी
चेंबूरच्या सुभाष नगर भागातील कोसळले झाड 70 वर्षे जुने होते. त्याच्या संरचनेबाबत किंवा स्थिरतेबाबत मुंबई महापालिकेकडे कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. हे झाड रस्त्यालगत होते आणि या रस्त्याचे काँक्रीटीकरण यंदा जानेवारीमध्ये करण्यात आले. या झाडाच्या बुंध्याभोवतीचा परिसर काँक्रीटचा करण्यात आला होता, ज्यामुळे झाडाच्या मुळांच्या वाढीस अडथळा निर्माण झाला असण्याची शक्यता सांगितली जाते. मुंबई महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष विभागाने यापूर्वीच रस्ते विभागाला कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. झाडाभोवती केले जाणारे खोदकाम अशास्त्रीय पद्धतीने केले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. या बाबतची पहिली नोटीस एप्रिल 2025 आणि दुसरी नोटीस जानेवारी 2026 मध्ये बजावण्यात आली होती. त्यानंतरही कुणीही याकडे गांभीर्याने पाहिले नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी नेहमीप्रमाणे 29 मे 2026 रोजी या वृक्षाची छाटणी देखील करण्यात आली होती. त्यावेळी झाड सुरक्षित असल्याचे दिसले होते. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महापालिकेच्या उद्यान विभागाकडून खबरदारीचा भाग म्हणून वृक्ष छाटणी केली जाते.

