पनवेल : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि 'देश प्रथम' या भावनेचा जागर करणाऱ्या भव्य 'तिरंगा पदयात्रे'चे पनवेल शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हातात तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक सहभागी झाल्याने संपूर्ण पनवेल शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.विशेष म्हणजे, पदयात्रेदरम्यान पावसाची संततधार सुरू होती. मात्र, पावसाची पर्वा न करता युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या उत्साहाने पदयात्रेत सहभागी झाले.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथून या तिरंगा पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली. पदयात्रा पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळून टपाल नाका, मिरची गल्ली मार्गे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली. या ठिकाणी पदयात्रेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर तिरंग्याचे रंग आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणांनी पनवेल शहर दुमदुमून गेले. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या उत्साहात सहभागी झालेले युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक हे या पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले.
हेही वाचा…लाल किल्ल्यावरील हल्ल्यामागे अल-कायदा, रासायनिक आणि जैविक शस्त्रांचा धोका वाढला
या पदयात्रेत भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जयंत पगडे, प्रभाग समिती सभापती मधू पाटील, अजय बहिरा, रवींद्र भगत, रवी जोशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, मयुरेश नेतकर, वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रभुदास भोईर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, यांच्यासह माजी सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शाळांचे विद्यार्थी, आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि सहभागी नागरिकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
तिरंग्याच्या सन्मानातून राष्ट्रभक्तीचा जागर
तिरंगा हा भारताच्या सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा, एकता आणि अखंडतेचा अभिमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतानाच नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, हा या पदयात्रेमागील प्रमुख उद्देश होता.स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी अधोरेखित करण्याचा दिवस आहे. तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहोचविण्यात आला.
हेही वाचा…स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल आणि इतर पथकांचा बीएमसी मुख्यालयासमोर सराव
पावसाच्या सरींतही देशभक्तीचा उत्साह कायम
पदयात्रेदरम्यान पावसाची संततधार सुरू होती. मात्र, प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता देशभक्तीच्या या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. हातात तिरंगा ध्वज घेत नागरिकांनी पावसाच्या सरी अंगावर झेलत पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने आणि देशभक्तीच्या उत्साहाने पावसावरही मात केली. पावसामुळे कार्यक्रमात कोणताही खंड पडला नाही; उलट देशभक्तीच्या उत्साहात ही तिरंगा पदयात्रा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पाऊस आणि देशप्रेमाची जिद्द यांचा अनोखा संगम या पदयात्रेत अनुभवायला मिळाला.

