भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या शृंगारात पायातील दागिन्यांना विशेष स्थान आहे. पायात घातली जाणारी जोडवी, बिचवे, मासोळी हे केवळ सौंदर्य वाढवण्याचे साधन नसून आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
या पारंपरिक दागिन्यांमागे धार्मिक श्रद्धेसोबत आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण रहस्ये दडलेली आहेत, ती जाणून घेऊयात.
जोडवी -
पायाच्या अंगठ्याशेजारील दुसऱ्या बोटात
धार्मिक महत्त्व - जोडवी स्त्रीला सौभाग्य, मंगल आणि संरक्षण प्रदान करते, अशी श्रद्धा आहे.
आरोग्यासाठी फायदे - पायाच्या दुसऱ्या बोटातील एक नस थेट स्त्रीच्या गर्भाशयातून हृदयापर्यंत जाते. चालताना जोडव्यांमुळे या नसवर सतत हलका दाब पडतो. यामुळे गर्भाशयातील रक्तभिसरण नियमित राहते, मासिक पाळीची समस्या नियंत्रित राहते आणि गर्भधारणा प्रक्रियेस मदत होते.
बिचवे -
पायाच्या मधल्या बोटात
धार्मिक महत्त्व -आकाराने बिचवे विंचूसारखे असल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण होते, अशी मान्यता आहे.
आरोग्यासाठी फायदे - पायाच्या मधल्या बोटाचा संबंध मज्जासंस्थेथी जोडलेला असतो. यासह या भागावर होणाऱ्या दाबामुळे पाठीचे दुखणे किंवा पायातील ताण कमी होण्यास मदत होते.
मासोळी -
पायाच्या चौथ्या किंवा करंगळी
धार्मिक महत्त्व -माशाच्या आकाराचे हे आभूषण मासोळी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात मासा हा भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराचे प्रतीक आहे. त्यामुळे मासोळी परिधान केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.
आरोग्यासाठी फायदे - चौथ्या बोटाचा अॅक्युप्रेशर पॉईंट पचनसंस्था आणि काही प्रमाणात हृदयाच्या कार्याशी संबंधित असल्याचे मानले जाते.
पायातील दागिने चांदीचेच का असतात?
पारंपरिक पद्धतीनुसार पायातील दागिने प्रामुख्याने चांदीचेच बनवले जातात. यामागे धार्मिक आणि आयुर्वेदिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात.
सोन्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे त्याचा अपमान होऊ नये म्हणून कमरेखाली सोन्याचे दागिने घालणे टाळले जाते. तर सोने शरीरात उष्णता वाढवते आणि चांदी शरीराला शीतलता देते. त्यामुळे आयुर्वेदानुसार शरीरातील तापमानाचे संतुलन राखण्यासाठी चांदी उपयुक्त मानली जाते.

