मुंबई : सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. 'देणगी चोर' असे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजला. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? असा प्रश्न उपस्थित करत नाव न घेता शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याप्रकरणी मविआ सरकारच्या काळात सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष असणाऱ्या आदेश बांदेकर यांनी "जर मी चुकीचा असेल, तर मला मंदिरासमोरच फासावर द्या" असे म्हटले होते. मात्र आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी "सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होते" असा दावा केला आहे. त्यामुळे आता विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांना राज ठाकरे यांना केलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आता सिद्धिविनायकमध्ये कोण होता, हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे तो दाखला आम्हाला लागू होतो का? त्यांच्या बाजूला बसलेले असतील त्यांना लागू होतो. हाही एक प्रश्न अनेक संभ्रमाचा निर्णय निर्माण होतो. जर त्यांच्याकडे (राज ठाकरे) अधिकची माहिती आताची असेल तर मग एवढे दिवस ते गप्प का बसले होते? हाही प्रश्न निर्माण होतोय. कारण परवाच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी जो मुद्दा मांडला होता. मी म्हणत नाही, हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण त्याची चर्चा न करता मला वाटतं विषयांतर करण्याचा दुर्देवाने प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.
राज ठाकरे यांनी काय दावा केला?
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, "माझ्याकडे एक पत्र आले आहे. प्रति एकनाथ शिंदे, विषय सिद्धीविनायक मंदिर न्यास मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत. आपण मंदिरात श्रद्धेने जातो, मंदिराच्या पेटीत दान करतो. धर्मासाठी दान करतो आणि तिथलेच कर्मचारी चोरी करताना पकडले जातात. हे कर्मचारी पकडण्याआधी दर बुधवारी रकमेची मोजदाद 50 लाखांच्या आत होती. कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दान पेटीची रक्कम 1.5 कोटी झाली आहे. याचाच अर्थ दानपेटीत जमा होणारी रक्कम लंपास होत होती. दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहे. त्यामुळे याची चौकशी करा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावा. विश्वस्त मंडळ, राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे यांचे हे पत्र आहे. आपल्या सिद्धीविनायक मंदिरातून तब्बल 18 कोटींची चोरी होते. आपण दानपेटीमध्ये टाकलेले दान ही माणसे करून घेऊन जातात. तरुण परीक्षेच्या वेळी देवाकडे जातात आणि पायऱ्या झिजवतात, तिथेच चोरी होते. विशेष म्हणजे तिथलेच विश्वस्त चोरी करतात. त्यामुळे आता सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. तसेच मंदिरात जावे तर मंदिरातच चोऱ्या होतात, असे म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

