मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन मेळावा आज (01 ऑगस्ट) मुंबईत पार पडला. या मेळ्याव्याला संबोधित करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी "सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा दावा केला.
राज ठाकरेंच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंचा दावा खरा असल्याचे म्हणत 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती दिली.
ट्रस्टी म्हणून ज्या वेळेला माझी नियुक्ती झाली आणि राज्य सरकारने 10 सदस्य दिले. त्यावेळेपासून हे उत्पन्न वाढावं आणि सिद्धिविनायक न्यासामध्ये जी काही अनियमितता आहे, त्याच्यावर कुठेतरी बंधनं आणावी, यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले. ते प्रयत्न करत असताना आमच्या लक्षात आलं की, परमनंट आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून ऑनलाईन व वेगवेगळ्या माध्यमातून पैसे घेतले जात असल्याची अनियमितता सापडली. त्यामुळे मी ट्रस्टी झाल्यावर साधारण 19 कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलं. त्यांच्यावर कारवाई केली आणि काही दिवस त्यांना निलंबित केलं. तसेच त्यांच्याकडून लिहून घेतलं की, यापुढे त्यांच्याकडून अशाप्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, अशी माहिती सरवणकर यांनी दिली.
सदा सरवणकर म्हणाले की, आमच्या लक्षात आलं की, बाहेरचं जे एजंट मंडळी किंवा स्टॉलधारक लोकांना परस्पर दर्शन देत आहेत आणि आर्थिक व्यवहार करत आहेत. हा प्रकारही आम्ही तातडीने बंद केला. त्यानंतर काही ठिकाणी कर्मचारी हातचालाखी करून पैसे काढत असल्याचे लक्षात आले, त्यावेळेला आम्ही पोलिसांना पत्र लिहून यासंदर्भात चौकशी करण्यास सांगितले. तसेच संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर 9 कर्मचारी पकडले गेले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जे उत्पन्न कमी होत होतं, ते वाढलेलं आहे. कारण आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष आहेत आणि त्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे, हे मला अभिमानाने सांगावं लागेल. तसेच जे पत्र दिलं आहे, त्या पत्रामागचा उद्देश होता की, दोन वर्षांपूर्वी साधारण 40-45 लाख रुपये जमा होत होते आणि आता साधारण 98 लाखांपर्यंत रक्कम वाढलेली आहे. त्यांच्यामध्ये फरक का होता, हे शोधावे ही यामागची भावना होती, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंनी गैरसमजाने काही गोष्ट सांगितल्या
राज ठाकरेंच्या आरोपाबाबत विचारले असता सदा सरवणकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलं, ते अर्धसत्य आहे. कारण आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे मंदिराचं उत्पन्न वाढलं आहे. मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं, त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, हे कोण करणार? असा प्रश्न उपस्थित करत सदा सरवणकर म्हणाले की, राज ठाकरेंनी एका सभेत बोलताना सिद्धिविनायक मंदिराबाबत गौरसमजाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. पण सिद्धिविनायक मंदिराचे आमचे जे काही विश्वस्त आहेत, ज्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या माध्यमातून चौकशी करा, अशा प्रकारची मागणी आमच्याकडून करण्यात आली होती. मात्र, हा उल्लेख करताना नागिरकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना निर्माण झाल्या. पण सिद्धिविनायक मंदिर न्यास अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसेच राज ठाकरेंनी वाचून दाखवलेल्या त्या पत्रामध्ये चोरी असा कुठेही उल्लेख नाही. दोन वर्ष म्हणजे पूर्वी सिद्धीविनायक मंदिर न्यासाची जी काही दानपेटी होती, त्या दानपेटीत येणारी रक्कम साधारण 40 ते 45 लाख रुपये होती. आता गेल्या महिन्यापासून ही रक्कम 90, 95 आणि 98 लाखांपर्यंत वाढली आहे. त्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या, त्यामुळे ही रक्कम वाढली. आता मागील दोन वर्षांचं ऑडिट सरकारकडे जाईल, तेव्हा वाढलेली रक्कम आणि दोन वर्षांपूर्वीची 40 ते 45 लाख ही रक्कम याचं संपूर्ण ऑडिट होईल, तेव्हा निश्चितच एक संशयाची भावना निर्माण होईल, त्यामुळे ते पत्र लिहिल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली.

