मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस सुरु असून भारतीय हवामान खात्याने पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
मुंबईमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून यवतमाळ, अमरावती तसेच पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून नद्यांना पूर आल्याने शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे. Maharashtra weather update
भारतीय हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, नाशिक जिल्ह्याला पुढील तीन तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. नदीकाठच्या नागरिकांनादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, धुळ्यातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जामनेर तालुक्यातील वाकी नदीला पूर आला आहे. तसेच, जळगाव जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यात तर गेले दोन दिवस पाऊस पडत असून पैनगंगा नदीला पूर आला आहे.
कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. या भागांत मुसळधार पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

