प्रेमानंद बच्छावमुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' साठी सात हजार कोटींची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सहकार विभागाने गुरूवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्ज थकबाकीची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महायुती सरकारने महत्वाकांक्षी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेत आतापर्यंत 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांची दुसरी यादी अपेक्षित आहे. एकूण 56 लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 32 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, तर 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिले जाणार आहेत.
हेही वााच - ब्रेन स्ट्रोकला नशा समजण्याची मुंबई पोलिसांकडून चूक, वृद्धाला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ
राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी पुरवणी मागणीत 20 हजार 552 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून 7 हजार कोटींचा निधी वितरित करण्यास सहकार विभागाने आज मान्यता दिली. हा निधी वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची दक्षता सहकार आयुक्तांनी घ्यावी. यासंदर्भातील अहवाल आणि खर्चाची माहिती राज्य सरकारला द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

