वसई : वसई- विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसला मंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी एव्हरशाईन परिसरात अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर बस जाऊन आदळल्याने बसमधील 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले.
अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून चालकाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी एव्हरशाईन परिसरात पालिका बसचा अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वसई स्टेशन ते वसई फाटा या मार्गावर धावणारी वसई-विरार महापालिकेची बस एव्हरशाईन येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जोरात जाऊन आदळली.
धडक इतकी जोरदार होती की बसमधील अनेक प्रवासी पुढील सीटवर आदळले. काहींच्या डोक्याला, नाकाला दुखापत झाली. अपघातानंतर बसमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातानंतर संतप्त प्रवाशांनी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. तसेच महापालिकेच्या बसची देखभाल, वाहनांची स्थिती आणि चालकांच्या कार्यक्षमतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

