Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरच्या ताजबागमध्ये बालमजुरीविरोधात कारवाई; दोन अल्पवयीन मुलांची सुटका, पुनर्वसन प्रक्रिया सुरू

नागपूरच्या ताजबागमध्ये बालमजुरीविरोधात कारवाई; दोन अल्पवयीन मुलांची सुटका, पुनर्वसन प्रक्रिया सुरू

Image Source:(Internet)

नागपूर : ताजबाग परिसरात बालमजुरीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेत प्रशासनाने दोन अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित संरक्षणाखाली घेतले आहे.

या मुलांच्या शिक्षण, आरोग्य तपासणी आणि पुनर्वसनासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बालगृहात दाखल करण्यात आले आहे.

ताजबाग परिसरातील काही हॉटेल्स, दुकाने आणि इतर व्यावसायिक ठिकाणी लहान मुलांकडून काम करून घेतले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या निर्देशानुसार विविध विभागांच्या संयुक्त पथकाने तपास मोहीम हाती घेतली.

या कारवाईत सक्करदरा पोलिस ठाण्याचे अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, चाइल्ड हेल्पलाइन आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पथकाने परिसरातील अनेक आस्थापनांची तपासणी केली असता दोन अल्पवयीन मुले काम करताना आढळून आली. त्यानंतर तातडीने त्यांची सुटका करून त्यांना आवश्यक संरक्षण देण्यात आले.

प्राथमिक पडताळणीत संबंधित मुलांना विशेष काळजीची गरज असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना मान्यताप्राप्त बालगृहात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या शिक्षणाची सोय, समुपदेशन, आरोग्य तपासणी तसेच कुटुंबीयांबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालमजुरी ही केवळ कायद्याचे उल्लंघन करणारी बाब नसून मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपणाच्या हक्कांवर परिणाम करणारा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही मोहीम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, चाइल्ड हेल्पलाइनचे अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धलाले, विकी डहारे, न्यू व्हिजन फाउंडेशनच्या प्रियंका होठे आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या रूपाली वानखेडे यांनी या कारवाईत सक्रिय भूमिका बजावली.

दरम्यान, ताजबाग परिसरात यापूर्वीही बालमजुरीविरोधी जनजागृती कार्यक्रम आणि तपास मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. तरीही काही ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याच्या तक्रारी कायम आहेत. यापुढे अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी दिला.

बालमजुरीमुक्त समाजाच्या दिशेने उचललेले हे पाऊल मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat