Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोन विद्यार्थी बुडाले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे.
पोलिस कर्मचारी आणि झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत एकाला वाचवले. अतुल रघुनाथ सुतार असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तर मयूर विष्णू खाडे याला स्थानिकांनी वाचवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले-सावने समुद्रकिनारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले-सावने समुद्रकिनारी आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. भरतीच्या वेळी पर्यटकांची एक कार समुद्राच्या पाण्यात अडकून वाहून जाण्याच्या स्थितीत पोहोचली होती. कार हळूहळू समुद्राच्या दिशेने सरकत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करत कारला धक्का देऊन सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसी कृतीमुळे मोठे आर्थिक नुकसान टळले. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुजरातमधील सुरतमध्ये दोन बसचा भीषण अपघात, 7 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू
गुजरात मधील सुरत (Surat) जिल्ह्यातून एक अत्यंत थरकाप उडवणारी आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर (Dhule Highway) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने 7 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातात बळी पडलेल्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन्ही बसचे क्रमांक MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 असे आहेत. जोरदार टक्कर होताच एक बस हायवेवर पलटी झाली आणि एका मोठ्या धमाक्यासह पेट घेतला. आग इतकी वेगाने पसरली की आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान झाला. महाराष्ट्र डेपोची एक एसटी बस धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात होती. याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसची तिच्यासोबत जोरदार धडक झाली.
Author : अमोल मोरे, एबीपी माझा

