Devendra Fadnavis Majha Vision: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुरुवातीला असुरक्षितता होती. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) काम करत आहेत, दृढता दिसते. महिना दोन महिन्यात पक्ष स्थिरस्थावर होईल.
त्यांच्या पक्षातील कोणालाही आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही. पण त्यांच्या पक्षाला जी मदत लागेल ती करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Majha Vision) म्हणाले. महाराष्ट्राचा 67 वा वर्धापन दिन...यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्पर्धा नाही- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Eknath Shinde)
2029 साली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असेल. डॉलरवर आमचे टार्गेट मागे पुढे होते. आम्ही आमच्या टार्गेटसाठी ऑन ट्रॅक आहोत. महाराष्ट्र अर्थव्यवस्था यूएई सिंगापूर यांना मागे टाकेल. Vision in action मध्ये आम्ही आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचा 67 वा वर्धापन दिन...यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्र पुढील 4 ते 5 वर्षांत इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही. 100 दिवस कार्यक्रमामुळे क्षमता वाढली. ज्या 20 गोष्टींसाठी जनतेला यावं लागतं. त्या सेवा आम्ही एआयच्या मदतीने सुलभ करू, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मेट्रो-3 मुळे 35 टक्के ट्रॅफिक कमी झालं. या मेट्रोसाठी ठाकरेंनी विरोध केला, पण सुप्रीम कोर्टानेही योग्य तोडगा काढला. महाराष्ट्र पहिले राज्य जे एनर्जी प्लॅनिंग केलं. आपल्या ऊर्जा खात्याला 52 अवॉर्ड मिळाले. आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्पर्धा नाही, आम्ही infra family मध्ये आहोत. आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत आहेत. आमच्यात श्रेय वाद नाही.
देवेंद्र फडणवीस अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Ashok Kharat Case)
खरात प्रकरण अतिशय वाईट, गलिच्छ...आस्थेचा बाजार कसा मांडला जातो हे दिसले. खरात प्रकरणाचा तपास अगदी योग्य सुरू आहे. लोकांना त्याची माहिती नाही. फोटो कुणाचे कुणासोबत ही असू शकतो. महाराष्ट्राला आश्वासन देतो, खरात सारख्या भोंदूंची जागा जेलमध्येच आहे, त्यांना आम्ही बाहेर येऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच रुपाली चाकणकरांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तपास अजून संपला नाही. थेट कोण-कोण संबंधी आहेत, त्याचा आधी तपास सुरु आहे आणि चार्जशीट दाखल करणे ही प्रायोरिटी आहे. गुन्हेगारांना चार्जशीट आधी फायदा मिळू नये हा हेतू आहे. तपास सुरू आहे, अजून खूप काही बाहेर येईल. चार्जशीट दाखल होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.
खरात कोणाकोणाकडे जात होता हे मी सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Majha Vision)
धर्माचे शुद्धीकरण सुरू आहे..त्यागाला महत्व आहे.. त्याग आणि त्यागी जर भोगी निघाला , तर अशी प्रकरणे येतात. अजून 4 ते 5 केसेस आल्या आहेत. मूळ महाराष्ट्राची प्रवृत्ती वारकरी संप्रदायाची आहे, महाराष्ट्र धर्माची आहे. अध्यात्म गुरूंना जे योग्य काम करतात त्यांना त्याच चष्म्यातून पाहणे योग्य होणार नाही. खरात कोणाकोणाकडे जात होता हे मी सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं मोठं विधानही देवेंद्र फडणवीसांनी केलं. तसेच एकनाथ शिंदेंचं नाव उगाच घुसवून आमचे संबंध बिघडवण्याचा हेतू आणू नका. अजित पवारांच्या घरासमोर पूजा झाली असेल तर चौकशी होईल. अपघाताशी अशोक खरातशी संबंध असेल तर ते सुद्धा बाहेर येईल. खरात पोपटासारखा बोलत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणाच्या फोटोसमोर क्रॉस मारले होते, याबाबत पोलीस बोलतील...असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
नाशिकमधील TCS प्रकरणावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Nashik TCS Case)
TCS कंपनीची या प्रकरणामध्ये कुठेही चूक नाही. कंपनीकडून तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. TCS कंपनीला बदनाम करणे योग्य नाही. पण त्या लोकांनी जे केलं ते सत्य आहे, त्याची शिक्षा त्यांना होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. नाशिकमध्ये जे झालं ते गुन्हाच आहे, जिहाद म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. सुनियोजित घटना घडवली जाते त्यामुळे लव्ह जिहाद आले. जाळ्यात अडकवायचे , लग्न करायचे सोडायचे.. मग दुसरे लग्न वगैरे.. अशी प्रकरणे बाहेर येतात तिथे सुनियोजित कट दिसतो. एखाद्या मुस्लिम तरुणाने इतर कुणाशी लग्न केले तर आमचा विरोध नाही. पण ओळख लपवून , एखाद्या हेतूने फसवून असे करत असेल तर त्यांना शिक्षा होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या इतिहासात कुठलीही टीका न करता आम्ही निवडणूक जिंकून दाखवली- देवेंद्र फडणवीस
माझ्या भाषणात विकासाशिवाय एकही शब्द नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात कुठलीही टीका न करता आम्ही निवडणूक जिंकून दाखवली. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एक असला की सगळे पोलीस खुश असतात. मला मार्किंग मी देणे हे माझी पाठ थोपटून घेण्यासारखे असेल. मला जनता मार्क देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गृह खात्यात पैसे घेऊन बदली होऊ शकत नाही.

