Sonal Dinusha Century Sl Vs Ind Colombo Test :भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुषाने पुन्हा एकदा फलंदाजीची छाप पाडली. पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दिनुषाने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांसमोर कडवी झुंज दिली.
पाचव्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. भारताने पहिल्या डावात 503 धावांवर डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेची अवस्था बिकट झाली होती. मात्र, संघ संकटात असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोनल दिनुषाने एकाकी किल्ला लढवत श्रीलंकेला सामन्यात टिकवून ठेवले. त्याच्या या खेळीमुळे भारताच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का बसला.
दोन कसोटी सामन्यांत तीन शतकांचा विक्रम (Sonal Dinusha Century In 2nd Innings Sl Vs Ind Colombo Test)
सोनल दिनुषासाठी भारताविरुद्धची ही कसोटी मालिका एखाद्या स्वप्नापेक्षा कमी ठरलेली नाही. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने आतापर्यंत तब्बल तीन शतके झळकावली आहेत. गाले कसोटीत पहिल्या डावात दिनुषाने 103 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता कोलंबो कसोटीत पहिल्या डावात 103 धावा केल्यानंतर त्याने दुसऱ्या डावातही शतक ठोकत भारतीय संघाला अक्षरशः हादरवून सोडले. दुसऱ्या डावात शतक पूर्ण करण्यासाठी दिनुषाने 196 चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने 6 चौकार लगावले. श्रीलंकेचे फलंदाज एका बाजूने माघारी परतत असताना दिनुषाने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ साधत संघाचा डाव सावरला.
दोन्ही डावांत शतक करणारा श्रीलंकेचा आठवा फलंदाज
या शतकासह सोनल दिनुषाने श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासात खास स्थान मिळवलं आहे. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो श्रीलंकेचा आठवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, भारताविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांत शतक करण्याचा पराक्रम करणाऱ्या श्रीलंकन फलंदाजांच्या यादीतही दिनुषाचे नाव आता आले आहे.
स्टँडमध्ये आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
दिनुषाच्या या ऐतिहासिक खेळीचा सर्वात भावनिक क्षण स्टँडमध्ये पाहायला मिळाला. मुलाने शतक पूर्ण करताच त्याची आई आपल्या भावना आवरू शकली नाही. मुलाच्या यशाचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एका बाजूला भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, तर दुसऱ्या बाजूला सोनल दिनुषा श्रीलंकेची आशा बनून मैदानावर उभा होता. आईच्या डोळ्यातील ते अश्रू आणि मुलाची झुंजार फलंदाजी या सामन्याला भावनिक वळण देणारी ठरली.
भारताच्या हातातून विजय निसटणार?
भारताने पहिल्या डावात 503 धावांचा डोंगर उभा करून श्रीलंकेवर प्रचंड दबाव टाकला होता. श्रीलंकेची फलंदाजी ढासळल्यानंतर सामना भारताच्या नियंत्रणात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सोनल दिनुषाच्या सलग शतकांनी सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

