पंढरीच्या वारीसाठी मार्गस्थ होणाऱ्या यंदाच्या पुणे जिल्ह्यातील दोन्ही मानाच्या पालखी सोहळ्यावर पावसाचे, पुराचे सावट पाहायला मिळाले.
देहूतून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 7 जुलै रोजी प्रस्थान झाले, मात्र मंदिर परिसरात नदीला आलेल्या पुरामुळे यंदा वारकऱ्यांना तिथं न येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
देहूतही मोजक्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले, यावेळी एकीकडे आनंद तर दुसरीकडे काही वारकऱ्यांच्या मनात मंदिरात पोहोचता न आल्याची खंतही होती.
आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले, मंदिर परिसरातील दृश्ये आनंद आणि भक्ती भावना निर्माण करणारी होती, पण इंद्रायणीकाठची दृश्य पाहून परंपरेत खंड पाडल्याचंही काहींना वाटून आलं.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय. मात्र अतिवृष्टीमुळे या प्रस्थान सोहळ्यावर मोठा परिणाम झाला. कारण वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पात्र सोडून वाहतेय.
त्यामुळं आजचा प्रस्थान सोहळा हा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडतोय. आजची ही दृश्य ड्रोनच्या नजरेतून तुम्ही पाहिली तर अलंकापुरीत नेमकी काय परिस्थिती आहे हे तुमच्या लक्षात येईल.
खरं तर प्रस्थानादिवशी या इंद्रायणीत पवित्र स्नान करायचं अन मग माऊलींच्या चरणी माथा टेकवायचं, अशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
म्हणूनचं पावसाने ओढ दिली अन नदी कोरडी असली तरी प्रस्थानावेळी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातो, दुष्काळ परिस्थितीत तर टँकरने नदीत पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. पण आज नदीत पाणी असताना वारकऱ्यांना पवित्र स्नान न करता, माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागतोय.
या परिस्थितीची कारणं या ड्रोन दृश्यात दडलेली आहेत. यंदा पवित्र स्नान करण्याच्या परंपरेत खंड पडलाय, याची थोडीफार खंत वारकऱ्यांच्या मनात नक्कीच असेल.

