Lalit Modi on Sanjiv Goenka: ऋषभ पंतने आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने सांगितले की, पंतने स्वतः कर्णधारपद सोडण्याची विनंती केली होती, जी स्वीकारण्यात आली आहे.
लखनौ संघ या हंगामात दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर राहिला. दरम्यान, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएल सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच पांड्याने व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाबद्दल कळवले. वरिष्ठ खेळाडूंशी असलेले मतभेद हे या निर्णयामागील कारण असल्याचे त्याने सांगितले.
मी पैज लावून सांगू शकतो की..
दरम्यान, आयपीएलमध्ये पहिली विकेट पडताच आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी लखनौ संघाचे मालक संजीव गोयंकांवर भलताच भडकला आहे. त्याने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट करत गोयंकांवर सडकून प्रहार केला आहे. मी पैज लावून सांगू शकतो की, या माणसाच्या मालकीच्या संघात तो तरुण खेळाडू एक दिवसही जास्त राहू शकत नव्हता; कारण ज्या पद्धतीने त्याचा जाहीर अपमान करण्यात आला, तो तो सहन करू शकला नसता, असे ललित मोदीने म्हटलं आहे. ललित मोदी म्हणाला की, मालकांना लिलाव, खेळाचे मैदान आणि मैदानावर खेळाडूंशी संवाद साधण्यावर बंदी घातली पाहिजे. जगातील इतर मोठ्या लीग्जप्रमाणे ते फक्त सामना संपल्यानंतरच मैदानावर येऊ शकतात. सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार हे फक्त संघ व्यवस्थापनाला (Team Management) दिले पाहिजेत.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
ललित मोदीने ट्विट करत म्हटलं आहे की, "हे खूपच घाईघाईत झाले. आणि इथे संजीव गोएंका (DrSanjivGoenka) प्रसारमाध्यमांमध्ये 'मी रिषभ पंतला १०-१५ वर्षे संघात ठेवेन' अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते. मी पैज लावून सांगू शकतो की, या माणसाच्या मालकीच्या संघात तो तरुण खेळाडू एक दिवसही जास्त राहू शकत नव्हता; कारण ज्या पद्धतीने त्याचा जाहीर अपमान करण्यात आला, तो तो सहन करू शकला नसता.
ठराविक संघासाठी न खेळण्याचा पर्याय असतो का?
लखनौ सुपर जायंट्स (LucknowIPL) संघासाठी हा अत्यंत दुर्दैवी दिवस आहे, जेव्हा मालक अशी परिस्थिती निर्माण करतो की खेळाडूला संघ सोडावा लागतो. माझ्या नियमांच्या पुस्तकात ही अशी गोष्ट आहे जी माझ्याकडून पूर्णपणे सुटली होती ती म्हणजे मालकांनी खेळाडूंशी कसे वागावे. यामुळे एक नवीन वाद सुरू होतो. जर लिलावात (Auction) एखाद्या खेळाडूला निवडले गेले आणि त्याला वाटले की तिथे त्याचा मानसिक छळ होऊ शकतो, तर त्या खेळाडूकडे त्या ठराविक संघासाठी न खेळण्याचा पर्याय असतो का? तर नाही, त्याच्याकडे असा कोणताही पर्याय नसतो. मग अशा प्रतिकूल आणि अपमानकारक वातावरणात त्याने त्या मालकासाठी खेळावे हे कितपत योग्य आहे? नक्कीच नाही.
तर त्या मालकाला संघापासून दूर ठेवले पाहिजे
यावर माझ्याकडे एक उपाय आहे. पण मला सर्व चाहते, क्रीडा पत्रकार आणि खेळाडूंनी या विषयावर उघडपणे चर्चा करावी असे वाटते. संघामध्ये शिस्त आणि आदर कसा राखायचा यावर चर्चा झाली पाहिजे, कारण ही गोष्ट पुढे जाऊन अत्यंत विषारी (Toxic) वातावरण तयार करू शकते. माझ्या मते एक उपाय असा असू शकतो की, फक्त खेळाडूंसाठी एक गुप्त तक्रार पेटी (Anonymous Complaint Box) असावी. जिथे खेळाडू आपली तक्रार गुप्तपणे नोंदवू शकतील आणि त्याची शहानिशा केली जाईल. यासाठी एक नवी व्यवस्था तयार करावी लागेल. जर तक्रार खरी असेल, तर त्या मालकाला संघापासून दूर ठेवले पाहिजे; तो त्याच्या गुंतवणुकीचा नफा घेऊ शकतो, पण त्याला खेळाडूंशी बोलण्याची किंवा संपर्क ठेवण्याची परवानगी नसावी.
मैदानावर खेळाडूंशी संवाद साधण्यावर बंदी घातली पाहिजे
खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अशी कडक पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की, मालकांना लिलाव, खेळाचे मैदान आणि मैदानावर खेळाडूंशी संवाद साधण्यावर बंदी घातली पाहिजे. जगातील इतर मोठ्या लीग्जप्रमाणे ते फक्त सामना संपल्यानंतरच मैदानावर येऊ शकतात. सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार हे फक्त संघ व्यवस्थापनाला (Team Management) दिले पाहिजेत. आयपीएल (IPL) आता कशापेक्षाही खूप मोठे झाले आहे. त्यामुळे आता या खेळाला जागतिक पातळीवर नेण्याची वेळ आली आहे. संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांच्यासारख्या लोकांमुळे संघ मालकांसाठी नवीन नियम लागू करणे आता नक्कीच गरजेचे झाले आहे."
इतर महत्वाच्या बातम्या
Author : जयदीप मेढे

