Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना विधानपरिषदेची (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनीदेखील आता विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतःचा उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा दिला जाईल; परंतु अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करेल. त्यानुसार, अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. आता यावरून राज्यसभा खासदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केलीय.
Jyoti Waghmare: नेमकं काय म्हणाल्या ज्योती वाघमारे?
ज्योती वाघमारे म्हणाल्या की, आघाडीची बिघाडी तर कधीच झाली आहे. त्यांच्यात कुठे एकमत होतं? अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी अधिकचा उमेदवार देण्याची हूल दिली. त्यातच उबाठाची बत्तीगुल झाली. त्यामुळे ते उभे राहण्याचे धाडस करू शकले नाही. त्यांना पराभवाची भीती वाटली का? काय माहिती नाही. शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत देखील सुप्रियाताईंना प्रत्येकाकडे जाऊन विनंती करावी लागली. आता तर काँग्रेस उघडपणे वेगळा पवित्र घेताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे भविष्य कागदावर राहिले आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
Vidhan Parishad Election 2026: एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
Author : आफताब शेख, एबीपी माझा

