Dailyhunt
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'

मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'

ABP माझा 2 weeks ago

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 9 आणि विधानपरिषद (Vidhanparishad) पोटनिवडणुकीच्या एक म्हणजेच एकूण 10 जागांसाठी आज राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऐनवेळी माजी आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तर, प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातही या उमेदवारीची जोरदार चर्चा असून बच्चू कडू यांच्यासमवेत राजकीय वाद असलेले आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी गौप्यस्फोट केला आहे. मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंना (Bachu kadu) आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना विधानपरिषद आणि आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर एकनाथ शिंदेंकडून मलाही ऑफर होती,पण मी देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, असे त्यांनी म्हटलं. शिवसेना वाढीसाठी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी पक्षात घेतलं, तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्या बच्चू कडूना शुभेच्छा आहेत. आता सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.

मला सुद्धा काही दिवसाआधी एकनाथ शिंदे, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांनी सांगितलं होतं की तुम्ही शिवसेनेसोबत या पण मी त्यांना सांगितलं की, मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे, राजकारणात आहे तोपर्यंत मी देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत निष्ठेने राहील. पण, मी महायुतीत तुमच्यासोबत आहे, असेही त्यांना सांगितल्याचं रवि राणा यांनी म्हटलं.

नवनीत राणांच्या पराभवात सिंहाचा वाटा?

शिवसेना वाढवण्यासाठी बच्चू कडू सारखा एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळाला आहे. राजकारणात कधीच टोकाची भूमिका नसते, लोकसभेमध्ये नवनीत राणांचा पराभव झाला, त्यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा होता ते जनतेला माहित आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा देखील हिशोब घेतला होता. त्यामुळे आता महायुती धर्म पाळून लोकसभा-विधानसभा एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. मला बच्चू कडूचा माझ्या वाढदिवसा दिवशी फोन आला, त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या शिवसेनेच्या निर्णयाबाबत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वैर हे कधी कायम नसते, असही रवि राणा यांनी म्हटलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha