Maharashtra Rain News : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघऱ आणि कोकणातही जोरदार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही भागात देखील चांगला पाऊस पडत आहे.
तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. चांगला पाऊस न झाल्यामुळं अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अशातच पावसाच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या ढगांमध्ये रिफ्रॅक्टरी ब्लॅक कार्बन म्हणजे काजळीचे बारीक कण अस्तित्वात असल्याचे समोर आलं आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे.
नेमकं काय आहे संशोधन?
भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचे संशोधन केलं आहे. हवेबरोबरच ढगांतील थेंबांचे नमुने घेऊन संशोधन केले आहे. कार्बनचे सूक्ष्म घटक यापुढेही असेच वाढल्यास त्यांच्या उष्णतेमुळे ढगांच्या निर्मितीस अडथळा होऊ शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळं पावसावर परिणाम होण्याची शक्यता देखील नाकाराता येत नाही. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कार्बन उष्णता शोषून घेतो. त्यामुळे त्याचे प्रमाण वाढल्यास स्थानिक पातळीवर तापमान वाढते. हे उष्ण कण ढगांच्या आत किंवा जवळ पोहोचल्यानंतर तापमानवाढीमुळे ढगांमधील लहान जलबिंदूंचे पावसाच्या थेंबात रूपांतर होण्याऐवजी त्यांचे बाष्पीभवन होते. याला 'सेमी-डायरेक्ट इफेक्ट' म्हणतात. यामुळे पावसाच्या निर्मितीला अडथळा होतो. त्यामुळं कमी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होते, असी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगांच्या खालच्या भागात हवेत ब्लॅक कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईसह ठाणे आणि कोकणात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की, आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Author : एबीपी माझा वेब टीम

