Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Final IPL 2026 : आयपीएल (IPL 2026) चा अंतिम सामना रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगला आहे.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्यात एका वादग्रस्त निर्णयामुळे मैदानावरील वातावरण कमालीचे तापले. गुजरातचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या पंचांनी जीवदान दिल्यानंतर आरसीबीचे खेळाडू आणि पंचांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
नेमकं काय घडलं मैदानावर? (Rajat Patidar Fumes 3rd Umpire)
गुजरात टायटन्स फलंदाजी करताना आरसीबीचा वेगवान गोलंदाज जेकब डफी गोलंदाजी करत होता. त्याच्या एका शॉर्ट-पिच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नीट झाला नाही आणि चेंडू हवेत उडाला. फाइन लेगला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने जमिनीच्या अगदी जवळून एक उत्कृष्ट झेल टिपला. आरसीबीच्या सर्वच खेळाडूंना खात्री होती की फलंदाज बाद आहे, त्यामुळे त्यांनी मैदानात एकच जल्लोष सुरू केला.
तिसऱ्या पंचांचा निर्णय अन् मैदानावर गोंधळ
मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल किंवा अंतिम खात्रीसाठी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे (Third Umpire) सोपवला. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाण्यापूर्वी जमिनीला स्पर्श केला होता की नाही, हे तपासण्यात आले. वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी फलंदाजाच्या बाजूने कौल दिला आणि वॉशिंग्टन सुंदरला नाबाद घोषित केले. हा निर्णय स्क्रीनवर दिसताच आरसीबी संघात नाराजी पसरली.
पाटीदार-विराटचा पारा चढला!
तिसऱ्या पंचांच्या या वादग्रस्त निर्णयामुळे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार प्रचंड संतापला. तो थेट मैदानावरील पंचांकडे गेला आणि त्याने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत स्पष्टीकरण मागण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, मैदानावरील अँग्री यंग मॅन आणि माजी कर्णधार विराट कोहली याच्याही चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. विराट पंचांच्या दिशेने चालत गेला आणि अत्यंत आक्रमकपणे आपली नाराजी व्यक्त करू लागला. वॉशिंग्टन सुंदरला पॅव्हेलियनमधून परत खेळण्यासाठी बोलावल्याने मैदानावर काही मिनिटे खेळ थांबला होता आणि कमालीचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
Author : किरण महानवर

