RCB vs GT IPL 2026 Final Washout Rules : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्याची क्रिकेट चाहत्यांना लागलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 31 मे रोजी अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात जेतेपदासाठी महामुकाबला रंगणार आहे.
क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीने गुजरातचा 92 धावांनी पराभव करून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर गुजरातने क्वालिफायर-2 मध्ये दमदार पुनरागमन करत फायनलचे तिकीट मिळवले. मात्र, या मोठ्या सामन्यापूर्वी एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. जर अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आले आणि सामना होऊ शकला नाही, तर विजेता कसा ठरणार?
31 मे रोजी सामना पावसामुळे थांबला तर? (RCB vs GT IPL 2026 Final Washout Rules)
आयपीएलच्या नियमांनुसार अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. जर 31 मे रोजी पावसामुळे सामना सुरूच होऊ शकला नाही किंवा मध्येच थांबला, तर सामना जिथे थांबला तिथून पुढील दिवशी म्हणजे 1 जूनला पुन्हा सुरू केला जाईल.
राखीव दिवशीही पाऊस आला तर? (RCB vs GT IPL 2026 Final reserve day)
अंपायर प्रथम सामना कमी षटकांचा करण्याचा प्रयत्न करतील. डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियमानुसार निकालासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 षटके खेळणे आवश्यक आहे. 5 षटकांचाही सामना शक्य झाला, तर मैदानावरील निकालावरच विजेता ठरेल.
दोन्ही दिवस पावसात वाहून गेले तर?
सर्वात वाईट परिस्थितीत 31 मे आणि 1 जून हे दोन्ही दिवस पावसामुळे पूर्णपणे वाया गेले, 5-5 षटकांचाही सामना होऊ शकला नाही आणि सुपर ओव्हरलाही संधी मिळाली नाही, तर ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये विभागली जाणार नाही. अशावेळी लीग टप्प्यातील गुणतालिकेचा नियम लागू होतो. लीग स्टेजमध्ये ज्या संघाने अव्वल स्थान मिळवले असेल, त्याला थेट विजेता घोषित केले जाते.
लीग फेरी संपल्यानंतर आरसीबी संघ +0.783 या उत्कृष्ट नेट रनरेटसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होता. त्यामुळे जर अंतिम सामना पूर्णपणे पावसात धुवून गेला, तर आरसीबीला आयपीएल 2026 चा विजेता घोषित करण्यात येईल.
अहमदाबादच्या हवामानाचा अंदाज काय सांगतो? (weather forecast for Ahmedabad)
गुजरातमध्ये 30 मेपासून प्री-मान्सून पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार साबरकांठा, मेहसाणा, गांधीनगर, महिसागर, खेडा, दाहोद, पंचमहल, आनंद, अहमदाबाद आणि वडोदरा या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे.
तथापि, 31 मेच्या संध्याकाळी अहमदाबादमध्ये हवामान तुलनेने अनुकूल राहण्याचा अंदाज आहे. आकाशात सुमारे 28 टक्के ढग असतील, तर पावसाची शक्यता केवळ 2 टक्के इतकी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून अंतिम सामना विनाअडथळा पार पडण्याची दाट शक्यता आहे.
Author : किरण महानवर

