Dailyhunt
Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण?

Tamil Nadu Result : रिक्षा चालक ते आमदार! पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याला दाखवलं आस्मान, पहिल्यांदाच निवडणूक आलेले विजय धामू कोण?

ABP माझा 5 days ago

Tamil Nadu Results : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्याचे कल हाती आले आहे.

यामध्ये पश्चिम बंगालसह आसाम आणि पद्दुचेरीमध्ये भाजपनं जोरदार मुसंडीमारली आहे. या तिनही राज्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. लोकशाहीत जनताच खरी मालक असते, याचे एक ज्वलंत उदाहरण तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दिसून आले. पेशाने ऑटोचालक आणि अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार विजय धामू यांनी रॉयपुरम मतदारसंघात मोठा विजय मिळवला.

विजय धामू यांनी 14000 मतांनी मिळवला विजय

विजय धामू यांनी 55 हजाराहून अधिक मते मिळवून आपल्या विरोधकाचा 14000 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. पाच वेळा एआयएडीएमकेचे आमदार राहिलेले आणि ज्येष्ठ नेते डी. जयकुमार यांना या मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना केवळ 18000 मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले, तर दिवंगत मंत्री रहमान खान यांचे पुत्र आणि डीएमकेचे उमेदवार सुबैर खान दुसऱ्या स्थानी आले.

जनतेनं कौटुंबिक वारसा आणि मोठ्या नेत्यांना नाकारून एका साध्या ऑटो चालकावर विश्वास ठेवला

रॉयपुरमच्या जनतेने या निवडणुकीत कौटुंबिक वारसा आणि मोठ्या नेत्यांना नाकारून एका साध्या ऑटो चालकावर विश्वास ठेवला आहे. विजय धामूने आपल्या प्रचारादरम्यान स्वतःला एक 'सामान्य माणूस' म्हणून प्रचार केला. तुम्ही आम्हाला नवीन चेहरे म्हणू शकता, पण आम्ही अनेक वर्षांपासून तळागाळाच्या स्तरावर काम करत आहोत. उमेदवारी जाहीर करताना त्याने अभिनेता विजयला भावनिकरित्या मिठी मारल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो पक्षाला मिळत असलेल्या वाढत्या जनसमर्थनाचे प्रतीक बनला. हा निवडणुकीचा निकाल एआयएडीएमकेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण ही जागा 1991 पासून जयकुमार यांचा बालेकिल्ला मानली जात होती. विद्यमान आमदाराच्या जागी सुबैर खान यांना उमेदवारी देण्याची डीएमकेची रणनीतीही त्यांच्यावरच उलटली. विजय धामू यांचा ऑटो स्टँडपासून विधानसभेपर्यंतचा प्रवास आता टीव्हीकेच्या 'सर्वसामान्य माणूस' अजेंड्याचे सर्वात मोठे प्रतीक बनला आहे. हा विजय आता केवळ रॉयपुरममध्येच नव्हे, तर संपूर्ण तामिळनाडूमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अभिनेता विजयच्या रणनीतीचा भाग म्हणून, टीव्हीकेने प्रत्येक जागेवर स्थानिक उमेदवार उभे केले आणि स्वतःला संपूर्ण राज्याचा चेहरा म्हणून स्थापित केले. 'थलपती फॅक्टर'च्या जोरावर पक्षाने तामिळनाडूमध्ये क्रांती घडवली आहे. धामू यांच्या रॉयपुरमच्या किनारपट्टी भागाला लक्ष्य करून तयार केलेल्या जाहीरनाम्यात मच्छीमार समाजाचा विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला होता, ज्यामुळे स्थानिक मतदार आकर्षित झाले.

अभिनेते विजय यांच्या 'तामिळगा वेत्री कळघम' पक्षाला तामिळनाडू मिळालं अभूतपूर्व यश

अभिनेते विजय यांच्या 'तामिळगा वेत्री कळघम' पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळालेलं अभूतपूर्व यश अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यांनी तब्बल पाच दशकांच्या... दोन अक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचं चक्र भेदलं आहे. तामिळनाडूचा निकाल हा केवळ प्रस्थापितविरोधी नाही, तर त्याच-त्याच चेहऱ्यांना कंटाळलेल्या जनतेचा हा कौल आहे. तेच डीएमके, एआयएडीएमके पक्ष आणि तेच-तेच चेहरे नाकारून तमिळनाडूच्या मतदारांनी ताज्या दमाच्या नेत्याचा, ताज्या दमाचा पक्ष सत्तेजवळ नेऊन ठेवला आहे. फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनीही राजकीय पक्ष, राजकीय संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. त्यांच्या मुलानं मात्र पहिल्याच फटक्यात तामिळी राजकारणातल्या धुरंधर नेत्यांना चारी मुंड्या चित केलं आहे. प्रस्थापित नेत्यांवर सातत्यानं होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि विजय यांची कोरी राजकीय पाटी हे समीकरण जुळून आल्यानं तामिळनाडूत हा चमत्कार बघायला मिळाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha