अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. दरम्यान अनेक संकटांचा सामना करत जगणाऱ्या नागरिकांसमोर आणखी एक मोठे संकट समोर येऊन ठाकले आहे.
सांगलीत महापुरामुळे नदीच्या पात्राबाहेर पडलेल्या मगरींचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. कवठेपिरान ते कारंदवाडी मार्गावरील ओढ्यात बारा फुटी मगर आढळली. परिसरातील तरुणांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगर जेरबंद केली. तीन दिवसांपूर्वीच सांगलीवाडी येथे मगर पकडली होती.
तसेच कसबे डिग्रज येथे मगरीचा मुक्त संचार सुरू होता. पुराच्या पाण्यात मगर दिसू लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पण पुराच्या पाण्यामुळे या मगरी वाहत मानवी वस्तीत आल्या आहेत. आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं उसंत दिल्यानं पाण्याची पातळी ओसरत आहे. अशात सांगली जिल्ह्याच्या वाळवा परिसरातील लक्ष्मी नगर भागात रस्त्यावर मगर फिरताना स्थानिक नागरिकांना आढळली आहे.
या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या वर्षभरात मगरींच्या हल्ल्यात जनावरांसह काही नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता पुरामुळे या मगरी पात्राबाहेर पडल्या आहेत. भक्ष्य शोधणार्या मगरी नागरी वस्तीत पोहोचत असल्याने पूरग्रस्तांना घराकडे परत जाताना मगरींचा सामना करावा लागत आहे.

