Maharashtra Weather Updates | ५ मे रोजी महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल दिसण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) ने विदर्भातील ७ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
या इशाऱ्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान बदलणार असले तरी राज्याच्या इतर भागांत उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे. कोकण पट्ट्यात मुंबई , ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत उष्ण आणि दमट हवामान राहील. या भागात तापमान ३३ ते ३५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाडा अधिक जाणवेल. Maharashtra Weather Updates
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांत कोरडे हवामान राहील. येथे तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत जाऊ शकते, विशेषतः दुपारी प्रचंड उष्णता जाणवेल.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथेही उष्ण आणि कोरडे वातावरण राहील. या जिल्ह्यात तापमान ३६ ते ३९ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड या भागांत उष्णतेची लाट कायम राहू शकते. काही ठिकाणी तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Updates
दरम्यान, विदर्भातील काही इतर भाग जसे अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम येथेही उष्णतेचा प्रभाव राहणार आहे, मात्र काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण दिसू शकते.
वादळी वाऱ्यांमुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. शक्यतो मोकळ्या जागेत थांबू नये, झाडाखाली उभे राहू नये आणि शेतीकाम करताना सावधगिरी बाळगावी. तसेच उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे आणि दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे आवश्यक आहे.

