Mumbai Megaprojects : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि उपनगरांमधील दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी 3 महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प पूर्ण झाले असून ते लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत . मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 2 बी चा चेंबूर विस्तार , सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) चा बीकेसी उन्नत मार्ग आणि ठाणे-बोरीवली जोड बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष गती घेणार आहे.
या पायाभूत सुविधांमुळे मुंबईकरांचा पूर्व-पश्चिम प्रवास अत्यंत सोपा आणि गतिमान होणार आहे.
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) चा BKC उन्नत मार्ग
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड चा नवीन BKC उन्नत मार्ग हा अंदाजे 1.4 किलोमीटर लांबीचा एक आधुनिक उड्डाणपूल आहे. हा मार्ग पूर्व उपनगरे आणि सायन-पनवेल हायवेला थेट वांद्रे-कुर्ला संकुलाशी (BKC) जोडतो. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे वाकोला, कुर्ला आणि कलानगर जंक्शन परिसरातील दररोजची मोठी वाहतूक कोंडी पूर्णपणे फुटणार असून, प्रवाशांना थेट सिग्नलमुक्त प्रवास करता येणार आहे. परिणामी, दररोज BKC मधील कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या हजारो नोकरदारांचा प्रवासाचा वेळ 30 ते 35 मिनिटांनी वाचणार असून इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. Mumbai Megaprojects
मेट्रो लाईन 2 बी (मंडाळे ते डी.एन. नगर) चेंबूर विस्तार
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणारा मेट्रो लाईन 2बी हा 23.6 किलोमीटर लांबीचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या प्रकल्पांतर्गत चेंबूरमधील ‘डायमंड गार्डन’ आणि मुख्य चेंबूर स्थानकाचा विस्तार जोडण्यात आल्यामुळे मानखुर्द, मंडाळे आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना वेगवान प्रवासाचा उत्तम पर्याय मिळणार आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईची लोकल रेल्वे, मोनोरेल आणि इतर मेट्रो लाईन्सशी (लाईन 1 आणि 2ए) इंटरकनेक्टेड म्हणजेच जोडला गेल्यामुळे प्रवाशांना ‘मल्टीमोडल’ प्रवासाची सुविधा लाभेल. या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमालीचा कमी होणार असून, पूर्व ते पश्चिम उपनगरांचा प्रवास अत्यंत गतिमान, वातानुकूलित आणि सुकर होणार आहे. Mumbai Megaprojects
ठाणे-बोरीवली जोड बोगदा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून (SGNP) जाणारा हा 11.84 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा अंतर्गत शहरी बोगदा आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या भुयारी मार्गाच्या खोदकामासाठी आधुनिक ‘टीबीएम अर्जुन’ यंत्र सज्ज झाले आहे. सद्यस्थितीत ठाणे ते बोरीवली जाण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरून तब्बल 90 मिनिटांचा वेळ लागतो. हा भुयारी मार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर हा मोठा प्रवास अवघ्या 15 मिनिटांवर येईल. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन लाखो लिटर इंधनाची बचत होईल. Mumbai Megaprojects
प्रवासाची अडचण कायमची दूर
MMRDA ने या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तारखांची मागणी केली असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला किंवा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हे तिन्ही प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुले केले जातील. हे महाप्रकल्प एकाच वेळी कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईतील सर्वात मोठी डोकेदुखी असलेली पूर्व-पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडी कायमची मिटणार आहे. Mumbai Megaprojects

