अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- पारनेर हा सातत्याने दुष्काळी असणारा तालुका पाण्यापासून वंचित राहिला आहे.
या तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी व विविध विकास कामांसाठी आमदार निलेश लंके यांनी 'मास्टर प्लॅन' तयार करावा,त्यांच्यामागे हिमालयासारखा उभा राहणार असल्याचे सांगतानाच आ. लंके यांच्या मतदारसंघात इतर आमदारांपेक्षा दुप्पट निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
तालुक्यातील भाळवणी येथील साईराज सहकारी पतसंस्थेच्या अद्यावत नूतन कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार हे होते.
या भागाच्या शेतीला पाणी देण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी आ. निलेश लंके यांची बैठक घडवून देऊन पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत
या मतदारसंघासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पतसंस्था चळवळीविषयी बोलताना पालकमंत्री म्हणाले की,
ज्यांच्याकडे पत नाही त्यांना पत मिळवून देण्याचे काम पतसंस्थांनी केले मात्र, आपण विश्वस्त नव्हे तर मालक असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने
अनेक पतसंस्था बुडाल्याचे सांगत येथील साईराज पतसंस्थेने शेतकरी, बेरोजगारांना आर्थिक मदत केल्याने संस्थेचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

