Dailyhunt
पोलीस कोठीत बाप-लेकाचा घेतला होता बळी. देशात पहिल्यांदाच 9 दोषी पोलिसांना थेट फाशीची शिक्षा

पोलीस कोठीत बाप-लेकाचा घेतला होता बळी. देशात पहिल्यांदाच 9 दोषी पोलिसांना थेट फाशीची शिक्षा

टीम बाईमाणूस

  • भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
  • लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
  • ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती.

भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती.

लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. पी. जयराज (वय 51 वर्षे) आणि त्यांचा ३१ वर्षीय मुलगा जे. बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहे. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला. नातेवाईकांनी आरोप केला की, त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्वाची ठरली

एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसांतच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती.

आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासा दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. सहा वर्षांनंतर, 2026 मध्ये, मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. मार्च 2026 मध्ये, सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.

नेमकं काय घडलं होतं?

जयराज हे तुतिकोरीन म्हणजेच थुतुकुडी जिल्ह्यातल्या सथांकुलममध्ये राहतात. इथेच त्यांचा मुलगा फेनिक्स APJ मोबाईल्स नावाचं एक दुकान चालवत होते. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हा पी. जयराज (58) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स (38) यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात दुकान उघडं ठेवल्याचा आरोप होता. 19 जूनला बेनिक्स यांचा दुकान बंद करण्यावरून स्थानिक पोलिसांशी वाद झाला. यामुळे मग सथांकुलम पोलिसांनी बेनिक्स आणि त्यांच्या वडिलांविरोधात FIR दाखल केली. यानंतर जयराज यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्यानंतर आपल्या वडिलांपाठोपाठ फेनिक्स हेसुद्धा पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा त्यांनाही कोठडीत डांबण्यात आलं. 21 जून रोजी त्यांना कोविळपट्टीच्या कारागृहात पाठवण्यात आलं.

या दोघांनाही संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या दोघांनाही पोलिसांनी कोठडीत अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यानंतर ते रस्त्यावर पडले. यामुळे मग त्यांना अंतर्गत दुखापत झाली, असं FIRमध्ये म्हटलं होतं.

बेनिक्स यांच्या छातीत दुखू लागल्यानं 22 जून रोजी ते खाली कोसळले. यानंतर त्यांना कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं. पण 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला. "त्यानंतर काही तासातच जयराज यांना बरं न वाटल्यानं दवाखान्यात भरती करण्यात आलं. त्यांचा मंगळवारी सकाळी 5 वाजता मृत्यू झाला."

या घटनेनंतर बेनिक्स आणि जयराज यांच्या नातेवाईकांनी संथाकुलममध्ये निदर्शन केलं होती. या भागातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. बेनिक्स यांचा 21 जूनच्या रात्री तर जयराज यांचा 22 जूनच्या सकाळी कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. 6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सीबीआय आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी मृत्युदंडाची मागणी केली होती. न्यायालयाने, हे प्रकरण पोलीस अत्याचाराचे एक गंभीर उदाहरण असल्याचे नमूद केले. इतकचं नाही तर सर्वात कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंच्या विषयावर देशव्यापी चर्चा सुरू झाली. अनेक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

न्यायालयाची कठोर शब्दांत टीका

या प्रकरणाचा निकाल देताना न्या. मुथुकुमारन यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, की त्यांनी दोघांना मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केले आहे. जेव्हा आम्ही विचारलं की या प्रकरणाची शिक्षा कशी असावी तेव्हा केंद्र सरकारने म्हटले की कठोरात कठोर शिक्षा व्हावी. याच बरोबर तामिळनाडू सरकारने देखील म्हटले की दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

न्या. मुथुकुमारन यांनी म्हटले की ही मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली आहे. ते पुढे म्हणाले की कोर्ट या प्रकरणाकडे असाच कानाडोळा करू शकत नाही. सुधारण्याची संधी देऊन देखील ते सुधरले नाहीत. त्या दोघांवर हल्ला फक्त याच कारणासाठी करण्यात आला की त्या दोघांनी कोरोनाकाळात मोबाईल दुकान उघडले. जर मद्रास हायकोर्टाने स्वतः जर या प्रकरणाची दखल नसती घेतली तर त्या दोघांचे मृतदेह दफन होण्याआधी या प्रकरणालाच पुरुन टाकण्यात आले असते.

पुढे न्यायाधीश म्हणाले, त्यांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला. त्यांना माफ करण्यात येऊ नये. वय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्यांची शिक्षा कमी केली नाही पाहिजे. हे सर्व जण शिक्षित आहेत. एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्यासाठी जन्मठेप पुरेशी नाही. प्रत्येक दोषीच्या शिक्षेचा तपशील ऐकवताना न्यायाधीश म्हणाले की दोषी असा विचार करू शकतात की हे गुन्हेगारी कृत्य करून ते 14 वर्षांनी तुरुंगातून सुटून जातील पण न्यायालय असं होऊ देणार नाही.

बेनिक्स यांच्या बहिणीने काय म्हटले?

बेनिक्स यांच्या बहिणीने पत्रकारांना सांगितले की "2020 मध्ये चौकशीच्या नावाखाली माझे वडील आणि माझ्या भावाची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. 6 वर्षांनंतर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती तो आज मिळाला."

त्या म्हणाल्या केवळ आमच्याच नाही तर सर्व सामान्यांसाठी न्याय आहे. त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला वाटतं असं कधीच कुणा कुटुंबासोबत होऊ नये. जर दोषींनी पुढे अपील केले तर आम्ही देखील पुढील न्यायालयात जाऊ आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BaiManus