मुंबई: महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर 'शक्ती कायदा' मंजूर केला. मात्र, दुर्दैवाने मागील 3 वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे धूळ खात पडला आहे.
भगिनींना न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा, यात हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्यात पुण्यातील नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे. याच गंभीर विषयावर आज मी राज्याचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहिले आहे.
ज्या मुंबईला आपण सुरक्षित मानतो, तिथेच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८% वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग आणि POCSO च्या घटनांची वाढती संख्या ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. महायुती सरकार लाडकी बहीण म्हणत केवळ इव्हेंटबाजी करत आहे.पण बहीण फक्त कागदावर लाडकी असून चालत नाही, तर ती रस्त्यावर, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. सरकारने आता पोकळ घोषणा थांबवून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल प्रत्यक्ष कृती करावी, यासाठी राज्यपालांकडे पत्र लिहून लक्ष देण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

