पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ही जागा लढवण्यास नकार देत सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर, आता काँग्रेसने या मैदानात उडी घेतली आहे.
"आम्ही कोणतीही घुसखोरी केलेली नाही, तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे," अशा शब्दांत काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. Prashant Jagtap
नेमकं प्रकरण काय?
अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेवर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आणि सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा दर्शवला. मात्र, मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ही 'बिनविरोध'ची खेळी रुचलेली दिसत नाही.
प्रशांत जगताप काय म्हणाले?
काँग्रेसने बारामतीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर 'घुसखोरी'चे आरोप होऊ लागले होते. या आरोपांना उत्तर देताना प्रशांत जगताप यांनी भूमिकेचे विश्लेषण केले-
शरद पवार गटाच्या माघारीनंतरच हा निर्णय घेतल्याचं जगताप म्हणाले, "सुप्रिया ताईंनी जेव्हा अधिकृतपणे जाहीर केले की राष्ट्रवादी (शरद पवार गट) तिथे उमेदवार देणार नाही, त्यानंतरच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे याला घुसखोरी म्हणणे चुकीचे आहे."
आम्ही ही निवडणूक लढवतोय कारण आम्हाला लोकशाही टिकवायची आहे."निवडणूक ही लोकशाहीचा कणा आहे. जर प्रमुख पक्षच लढणार नसतील, तर लोकशाही कशी टिकणार? आम्ही या निवडणुकीकडे निव्वळ सत्तासंघर्ष म्हणून नाही, तर लोकशाही मूल्यांचे रक्षण म्हणून बघतोय."असेही जगताप म्हणाले.
विशेष प्रतिनिधी

