पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.यंदा होणाऱ्या निवडणुकीत अभिनेनेत विजय पाटकर आणि मेघराज भोसले अशी लढत होण्याची अपेक्षा होती.मात्र, निवडणुकीत मला उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केला आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात उडी घेतली आहे.सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून खळबळजनक आरोप केले आहेत. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री उदय सामंत यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत नीलम शिर्के यांचा विजय निश्चित करण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. सत्तेचा दबाव, प्रशासकीय प्रभाव आणि राजकीय ताकद वापरून निवडणुकीचे वातावरण प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. " कलाक्षेत्र हे कलाकारांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. मात्र सत्ताधारी राजकारणी आता या क्षेत्रावरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे".असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
भोसले आणि पाटकरांचे आरोप प्रत्यारोप..
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि मेघराज भोसले यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. विजय पाटकर यांनी मेघराज भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत, "मागील दहा वर्षांत महामंडळाचे अक्षरशः थडगे करण्यात आले. कर्मचाऱ्यांना सात महिने पगार देण्यात आला नाही. अशा व्यक्तीने मला त्यांच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देणे हेच आश्चर्यकारक आहे," अशी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना मेघराज भोसले यांनीही विजय पाटकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "विजय पाटकर हे इंडस्ट्रीसाठी कलंक असून, अभिनयापेक्षा लोकांना फसवण्यात ते पुढे आहेत. अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची दिशाभूल करण्यात आली. तसेच त्यांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोपही पूर्णपणे खोटा आहे," असा दावा भोसले यांनी केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे चित्रपट महामंडळाची निवडणूक आता अधिकच वादग्रस्त बनली आहे.
विशेष प्रतिनिधी
