चेन्नई : तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीके सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. "सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला," असा आरोप करत मोदी यांनी दक्षिणेतील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले.
कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर विश्वासघाताचे राजकारण केल्याचा आरोप केला. Narendra Modi
मोदी म्हणाले की, "२५ ते ३० वर्षे काँग्रेस आणि द्रमुक यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेक वेळा द्रमुकने काँग्रेसला राजकीय संकटातून बाहेर काढले. २०१४ पूर्वी केंद्रातील काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार द्रमुकच्या पाठिंब्यावर टिकले होते. मात्र राजकीय वारे बदलताच काँग्रेसने त्याच मित्रपक्षाला सोडून दिले."
"आता काँग्रेसला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सतत नव्या पक्षांच्या आधाराची गरज भासत आहे," असा टोला देखील मोदी यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
முதுகில் குத்துவது காங்கிரஸுக்கு இயல்பானது. தமிழ்நாட்டில் என்ன நடந்தது என்பதைப் பாருங்கள்… pic.twitter.com/XxXclSkdVq
- Narendra Modi (@narendramodi)
दरम्यान, तमिळनाडूमध्ये टीव्हीकेने इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली असून जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह आठ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर मोदी यांनी विजय यांचे अभिनंदन करत केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
विजय यांच्या नव्या मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, बहुमतासाठी निर्णायक पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या एकाही नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.
विशेष प्रतिनिधी

