पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे.कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.१७ मतदारसंघांपैकी काँग्रेसला ८ जागा, शिवसेना ठाकरे गटाला ४ तर राष्ट्रवादीत शरद पवार गटाला ३ जागा मिळाल्या आहेत.अजूनही २ जागांवर महाविकास आघाडीमध्ये संभ्रम कायम आहे.
विधानपरिषद जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक पार पडली.बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागावाटपाबद्दल माहिती दिली.१५ जागांचा तिढा सुटला असून, नांदेड आणि नाशिक या दोन जागांसाठी अजूनही रस्सीखेच कायम आहे.
कोणत्या जागा कुणाला?
पुणे, सांगली - सातारा आणि ठाणे - पालघर या तीन जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार आहे.चंद्रपूर - यवतमाळ, भंडारा - गोंदिया, नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव - बीड - लातूर, अमरावती, सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.तर छत्रपती संभाजीनगर - जालना, परभणी - हिंगोली, जळगाव आणि रायगड शिवसेनेच्या वाट्याला आला आहे.
सपकाळांचा भाजपावर आरोप..
भाजपकडून मित्रपक्षांचे मतदार पळविण्यात येत आहेत.२०१४ मध्ये वोटचोरी करून ते मुख्यमंत्री झाले होते.आता घोडेबाजार करून आपली सत्ता कायम करत आहेत. हार - जीत होत राहील,निवडणुका देखील येतील जातील.पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मतदारांना साद घालणार आहोत.लोकशाहीचा उत्सव म्हणजे या निवडणुका असतात, या उत्सवात भाजपाकडून विरझण घालण्यात येत आहे,असा आरोप सपकाळांनी केला.
विशेष प्रतिनिधी

