मुंबई : Murshidabad पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका आश्रमाबाहेर झालेल्या बॉम्ब हल्यातील फरार आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बोरीवली परिसरातून अटक केलीय. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच 14 मे रोजी ही हादरवून टाकणारी घटना घडली होती.
याप्रकरणी बहरामपूर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आलाय.Murshidabad
गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटनं बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातून या दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. रॉकी खान (24) हा पेशानं ड्रायव्हर आहे. तर शहादत सरकार (35) हा व्यवसायानं मजूर असून तो नतूनपुराचा मूळ रहिवासी आहे. मुंबई क्राईम ब्रांचनं अटकेनंतरची कायदेशीर कारवाई पूर्ण करून आरोपींची दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.Murshidabad
मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययू पथकानं मिळालेली गुप्त माहिती आणि आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी बोरीवली रेल्वे स्थानक परिसरात येताच पोलिसांनी सापळा रचून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध आता पश्चिम बंगाल पोलीस घेत आहेत.
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथील व्यावसायिक पशुपतीनाथ साहा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, अली हुसेन ऊर्फ लादेन, हसन एसके आणि त्यांच्या इतर तीन अज्ञात साथीदारांनी हा कट रचल्याचं समोर आलं. 12 मे आश्रमाशेजारील माँ दुर्गा मंदिरासमोरील वीज खांबावर लावलेले फोटो काही अज्ञात इसमांनी फाडले होते. त्याचा राग म्हणून 13 मेच्या रात्री आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह तिथं येऊन आश्रमासमोरील मोकळ्या मैदानात सॉकेट बॉम्ब फेकले. या भीषण स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे आसपासच्या परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. त्यानंतर 14 मे च्या सकाळी 10:30 आरोपी दुचाकीवरून पुन्हा साहा यांच्या दुकानाबाहेर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार केली, तर आणखी मोठे बॉम्बस्फोट करू, अशी धमकी साहा यांना देऊन ते पसार झाले. साहा यांनी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी 15 मे रोजी कोलकाता पोलिसांनी बहरामपूर पोलीस ठाण्यात याबाबत रितसर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी अटकेच्या भीतीनं पश्चिम बंगालमधून पसार झाले. ते 'गीतांजली एक्स्प्रेस'ने मुंबईत पळून आल्याची गोपनीय माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी मुंबई क्राईम ब्रांचला दिली होती.

