पुणे : Pune News रिक्षा संघटनांनी केलेली भाडेवाढीची मागणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्य केली आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडण्यात येणार आहे.
समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी याला मान्यता देताच पुण्यात रिक्षाची भाडेवाढ लागू होईल.Pune News
आखाती देशांमध्ये होणाऱ्या युद्धांमुळे 'सीएनजी'सह पारंपरिक इंधनाच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होत असल्याचे सांगून रिक्षा संघटनांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत परिवहन कार्यालयाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून पुणे प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडला आहे. त्याला पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'आरटीए'च्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Pune News
पुणे आरटीओ (RTO) अधिकारी आणि विविध रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रस्तावानुसार भाडेदर खालीलप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे. सध्याचे दर हे पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपयांवरून थेट 30 रुपये केले जाण्याची शक्यता आहे. पुढील प्रति किलोमीटर दर हे सध्याच्या 17 रुपयांवरून 20 रुपये केला जाऊ शकतो.
खाटुआ समितीच्या निकषानुसार वास्तविक भाडेवाढ याहून अधिक होऊ शकत होती. मात्र, नागरिकांवर अधिक ताण पडू नये म्हणून संघटनांनी पहिल्या 1.5 किमीसाठी 30 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपयांचीच मागणी लावून धरली असल्याचे रिक्षा पंचायतीने सांगितले.
पुण्यात सध्या सीएनजीचा दर 95.75 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. जून महिन्याच्या मध्यावर सीएनजीचे दर वाढल्यानंतर भाडेवाढीच्या मागणीने गती घेतली आहे. संघटनांच्या मागणीनुसार, 1 ऑगस्टपासून नवीन दर लागू झाल्यास त्यापूर्वी रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण केले जाईल. तोपर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी आरटीओने नवीन भाडे कार्ड प्रसिद्ध करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
दरम्यान, समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी याला मान्यता दिली तर पुण्यात रिक्षाची भाडेवाढ लागू होईल. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशाला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

