पुणे : गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. शहरातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावासाची तीव्रता वाढल्याने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला, पानशेत, भामा- आसखेड, नीरा-देवघर आणि वीर या प्रमुख धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Pune Rain)
Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या ! 1 ऑगस्टपासून रिक्षा प्रवास महागणार ?
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
शुक्रवारी (दि. 31 जुलै) सकाळी खडकवासला धरणातून 9 वाजता विसर्ग सुरू करण्यात आला होता. सुरूवातीला मुठा नदीत 7 हजार 925 क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाण्याची पातळी वाढल्याने सकाळी 10.30 वाजता विसर्ग वाढवून 16 हजार 247 क्युसेक करण्यात आला होता. परंतु पाण्याच्या पातळीत होत असलेल्या वाढ आणि पाणलोट क्षेत्रात पावसाची तीव्रता वाढल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्याद्वारे दुपारी 12 वाजता 22 हजार 880 क्युसकने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पावासाच जोर सतत वाढत असल्याने खडकवासला धरणातून 35 ते 40 हजार क्युसेक्स पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
तर पानशेत धरण 98.82% भरले असून जलविद्युत केंद्रातून 600 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. सांडव्यातील विसर्ग वाढवून 3 हजार 196 क्युसेक करण्यात आला आहे. भामा-आसखेड धरणातून भामा नदीत सुरू करण्यात आलेला 7 हजार 425 क्युसेक विसर्ग 9 हजार 900 क्युसेक करण्यात आला आहे.
नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची पातळीत 97.42% वाढ झाली आहे. यामुळे सांडव्याद्वारे 11 हजार 947 क्युसेक आणि जलविद्युत गृहातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत सांडव्याद्वारे 23 हजार 120 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1 हजार 100 क्युसेक, असा एकूण 24 हजार 220 क्युसेकने पाणी सोडण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, जलसंपदा विभागाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, मुठा, भामा आणि नीरा नदी काठच्या नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठावरील जनावरे, पंप, शेतीची अवजारे व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत असे सांगितले आहे. पावसाचा जोर आणि धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात कमी अथवा अधिक बदल होऊ शकतो हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

