गोरेगाव,दि.६- तालुक्यातील मोहाडी येथे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेमुळे गावातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात होणार असून, प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमास पंचायत समिती गोरेगावचे उपसभापती रामेश्वर महारवाडे, सरपंच नरेंद्र चौरागडे, उपसरपंच वाकले, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांवर प्रकाश
टाकताना सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. यामुळे महिलांवरील पाण्याच्या टंचाईमुळे होणारा ताण कमी होणार असून, आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळणार आहे. तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे. डॉ. भगत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जलजीवन मिशन ही केवळ पाणीपुरवठा योजना नसून ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करणारी एक क्रांतिकारी योजना आहे. शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या योजनेचा योग्य वापर करून गावकऱ्यांनी पाण्याचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले.

