Dailyhunt
मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देवून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देवून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ॲक्शन मोडवर; जिल्हास्तरीय यंत्रणांकडून कामांचा आढावा

लातूर, दि. 07 : जिल्ह्यातील जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे आगामी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे.

यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रगतीपथावरील कामांना गती देण्याच्या सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच या कामांच्या संथगतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे राज्यस्तरीय व विभागस्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी जिल्ह्यातील जलसंधारण कामांची पाहणी केल्यानंतर जलसंधारणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

लातूर जिल्ह्यात जलसंधारणाची काही मंजूर कामे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत. या कामांची पडताळणी करून यापैकी कोणती कामे नव्याने प्रस्तावित करता येणे शक्य आहे, याची खात्री करावी. तसेच सन 2022-23 मधील पासून काही कामे अपूर्ण असल्याचे दिसून येत असून ही कामे पूर्ण करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. काही योजनांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असून ते प्राप्त करून घेण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून 17 कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. या प्रकल्पांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत होणारी सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे. या कामांची जिओ टॅगिंग होणे आवश्यक आहे. या कामांची आवश्यकतेनुसार त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत अभिसरणाची कामे, विशेष निधीतील कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या. निधी उपलब्ध असतानाही जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी, तसेच ती पूर्ण करण्यासाठी विलंब होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच प्रगतीपथावरील सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

भूसंपादनामुळे रखडलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेताना आवश्यकतेनुसार भूसंपादनासाठी निधी वितरित करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील पाझर तलाव दुरुस्ती, जलसंधारणाच्या जुन्या कामांची दुरुस्ती आणि नवीन कामांचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागाने तयार करावा. सर्व संबंधित विभागांनी जलतारा प्रकल्प राबविण्याला प्राधान्य द्यावे. सध्या पुरेसा पाणीसाठा असला तरी 'एल निनो'मुळे निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, संजय नाईक यांनी मृद व जलसंधारण विभागामार्फत गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES