अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी मिळून तब्बल २२ साखर कारखाने कार्यरत आहेत. यामध्ये १० कारखाने हे खासगी तत्त्वावर सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यांच्या गाळप क्षमतेचा मोठा विस्तार केला आहे.
गाळप क्षमता वाढल्याने अनेक कारखान्यांचे गाळप शंभर दिवसांतच उरकते. परिणामी नंतर कामगारांना काम बंदी करुन अर्धा पगार देण्याची वेळ कारखान्यांवर येत आहे. गेल्या काही वर्षात सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली. प्रवरा, घुले पाटील, भाऊसाहेब थोरात या कारखान्यांनी त्यात आघाडी घेतली. त्यामुळे हंगाम लवकर आटोपत आहे.
जिल्ह्यातील २२ कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन १ लाख ७५० मे. टन आहे. हंगामात १ कोटी ३ लाख ४८ हजार मे. टन गाळप झाले आहे. सरासरी हंगाम कालावधी १०० ते ११० दिवसांचा आहे. त्यामुळे कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. अलिकडेच अशोक कारखान्याने कामगार संघटनेशी करार केला आहे. त्यात कारखान्याचा गाळप हंगाम संपल्यानंतर कायम व हंगामी कायम कामगारांना काम राहणार नाही. काम नसलेल्या काळात त्यांना केवळ ५० टक्के वेतन अदा केले जाईल, असे म्हटले आहे. याचा अर्थ साखर कारखान्यात आता केवळ हंगामाच्या दोन-तीन महिन्यांतच कामगारांना पूर्ण पगार मिळेल. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मते साखर कारखान्यांच्या देखभाल दुरुस्तीची अनेक कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात. ती कामे कामगारांकडून करून घ्यावी. बिगर हंगामात कामगारांच्या हाताला काम देण्यासाठी धोरण आखावे, असे मत मांडले आहे.

