बीड : थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केले. थकीत ऊस बिलांसह प्रलंबित अतिवृष्टी अनुदान, पीकविमा या विषयांवर किसान सभेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
यावेळी डॉ. नवले बोलत होते. किसान सभेचे नेते डॉ. नवले, अॅड. अजय बुरांडे, रोहिदास जाधव, मोहन जाधव, कृष्णा सोळंके आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
डॉ. नवले म्हणाले कि, रब्बी पेरणीच्या मदतीतून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना प्रति हेक्टर दहा हजार रुपयांचे रब्बी पेरणीपूर्व अनुदान अद्याप मिळालेले नाही. तसेच केवायसी प्रलंबित असल्याने व संयुक्त खातेधारक शेतकरी विविध अडचणींमुळे या अनुदानापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी किसान सभेच्या नेत्यांनी दिला. यावेळी अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टिग्रस्तांना सरसकट पीक विमा देण्याचे घोषित केले होते. मात्र, या पॅकेजमध्ये केलेले दावे फसवे असल्याचे दिसते, असा आरोप डॉ. नवले यांनी केला.

