पणजी : गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे आंबा आणि काजू उत्पादनात सातत्याने घट होत असताना यंदा गोव्यातील बागायतदारांसाठी दिलासादायक चित्र समोर आले आहे. दैनिक 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, राज्यात आंबा आणि काजू या दोन्ही प्रमुख नगदी पिकांच्या उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
कृषी संचालनालयाचे उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवेळी पाऊस, वाढते तापमान आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे दरवर्षी काजूच्या मोहोराचे नुकसान होते. यंदाही काही प्रमाणात मोहोर करपला आणि विशेषतः दुसऱ्या पाड्यात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. मात्र, पहिला आणि शेवटचा पाडा चांगला झाल्याने एकूण काजू उत्पादन समाधानकारक राहिले.
कोकण पट्ट्यातील काही भागांत आंबा आणि काजू उत्पादनात घट झाल्याचे चित्र असले, तरी गोव्यात मात्र परिस्थिती सकारात्मक राहिली. मागील चार-पाच वर्षांपासून काजू उत्पादनात सुरू असलेली घसरण यंदा थांबली असून राज्यातील बागायतदारांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यातील काही भागांत अजूनही काजू काढणीचे काम सुरू असून प्रक्रिया भट्ट्यादेखील कार्यरत आहेत.यंदा मानकुरादसह विविध जातींच्या आंब्यांना भरघोस बहर आला असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारातही आंब्यांची आवक वाढली आहे. गोव्यातील बागायतदारांसाठी यंदाचा हंगाम आशादायी ठरत असून आंबा-काजू उत्पादनवाढीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

