कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी साखर कारखान्याची २०२५-२६ हंगामातील १६ जानेवारी ते १६ फेबुवारी २०२६ पर्यंतची २७ कोटी ७८ लाख इतके बिल प्रतिटन ३४०० रुपयांप्रमाणे विनाकपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत.
त्याचबरोबर तोडणी वाहतूक बिलाची दोन कोटी रुपयांची रक्कमही जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
देसाई म्हणाले, ‘कारखान्याने १०५ दिवसांत तीन लाख ६ हजार टन उसाचे गाळप करून तीन लाख ६३ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा बँकेचे सहकार्य मिळाले आहे. संचालक मंडळाने आगामी गळीत हंगामासाठी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी करार करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील हंगामासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, आंबोली भागांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू केले आहे. संबंधित शेती कार्यालयाशी संपर्क साधून करार करावेत. तसेच ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपल्या वाहन व मजुरांचे तोडणी वाहतुकीचे करार मुदतीत करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

