कोल्हापूर : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या वर्षभरात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचाऱ्यांना आर्थिक साहाय्य असा संयुक्त कार्यक्रम झाला.
साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे प्रमुख उपस्थित होत्या. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांनी कारखान्याचे कामकाज करताना कामगारांना कुटुंबातील सदस्य मानून जिव्हाळ्याची व आपुलकीची वागणूक दिली. कारखान्याच्या यश, नावलौकिक आणि प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
शाहू उद्योगसमूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी आपल्या कुटुंबापेक्षाही कारखाना आणि कर्मचाऱ्यांना अधिक वेळ दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याची ग्वाही कारखाना व्यवस्थापनाने दिली. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.

