सांगली : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना आडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी आणि ट्रॅक्टर भाड्यात मोठी वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधाराची गरज आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील प्रतिटन ७०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सर्व साखर कारखान्यांकडे केली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट तर साखर उद्योगाची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेने म्हटले आहे की, रासायनिक खतांच्या पोत्याचे दर २,५०० ते २,७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादन करणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. सद्यस्थितीत साखरेचा विक्री दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांवर पोहोचला असून किरकोळ बाजारात साखर ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. त्यामुळे साखर कारखाने फायद्यात असून त्यांनी आपल्या नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे.

