बाजपूर : साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ऊस लागवड क्षेत्र वाढविणे आणि साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी देखभाल- दुरुस्तीची तयारी सुरू करण्याचे निर्देश ऊस विकास सल्लागार समितीचे सहअध्यक्ष मंजीत सिंह राजू यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. साखर कारखान्याच्या अतिथीगृहात सोमवारी मंजीत सिंह राजू यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, यामधील अडचणी दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मंजीत सिंह राजू म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर मिळाली पाहिजेत याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. साखर कारखान्याच्या व्यवस्थापनातील ज्या अडचणी आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करून त्यांची सोडवणूक केली जाईल. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा कारखान्याच्या महाव्यवस्थापक डॉ. अमृता शर्मा यांनी अधिकाऱ्यांना ऊस लागवड क्षेत्रामध्ये वाढ आणि कारखाना देखभाल-दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष देण्याची सूचना केली. यावेळी साखर कारखान्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

