खराडी-केशवनगर पूल, महापालिकेची दशकाची दिरंगाई, नागरिक रस्त्यावर; संतप्त नागरिकांनी हटवले बॅरिकेड्स
प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीनतेचा कळस गाठणाऱ्या खराडी ते केशवनगर दरम्यानच्या बहुप्रतीक्षित पुलाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे.
तब्बल १० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही हा महत्त्वाचा जोडपूल वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. आम्ही आणखी किती दिवस वाट पाहायची? असा संतप्त सवाल करत संतापलेल्या नागरिकांनी स्वतःच रस्त्यावरील बॅरिकेड्स बाजूला करून या बंद पुलावरून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या जनक्षोभामुळे खराडी-केशवनगर परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्व पुण्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या आयटी हब आणि निवासी क्षेत्रासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक मानला जात होता. मात्र, काम पूर्ण होत आले असूनही हा पूल नेमका कधी आणि का सुरू केला जात नाही, याबद्दल पुणे महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. हा पूल स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे आणि नियोजनाच्या अभावाचे जिवंत प्रतीक बनला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही पूल सुरू झालेला नाही. त्रस्त झालेल्या लोकांना आता स्वतःहून बॅरिकेड्स बाजूला सारून रस्ता तयार करावा लागत आहे. हा पूल कधी सुरू होणार की नाही, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. - शिवराज घुले ,रहिवासी, केशवनगर
प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे. एकंदरीत, खराडी-केशवनगर पुलाचा वाद आता चिघळला असून, महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या दिरंगाईमुळे शाळकरी मुलांच्या बसेस, रुग्णवाहिका आणि आयटीमधील नोकरदार तासन्तास कोंडीत अडकत आहेत. हा केवळ सुविधेचा प्रश्न नाही, तर आमच्या आयुष्यातील वाया गेलेली वर्षे आहेत. खराडी आणि केशवनगरमधील वाहतूक कोंडीने श्वास कोंडला आहे, हा पूल अर्धी समस्या सोडवू शकतो, पण तो धूळ खात पडला आहे.
-डॉ. ईशा झा, रहिवासी, खराडी
प्रशासनाने पारदर्शकता दाखवावी
पूल डोळ्यांसमोर तयार दिसतोय, पण तरीही तो बंद का? रोज तिथून जाताना आम्हाला हा प्रश्न पडतो. अधिकाऱ्यांनी मौन सोडून उत्तर दिले पाहिजे, असे रोज प्रवास करणारे सुमीत पिन्नम यांनी सांगितले. स्थानिक ज्येष्ठ नागरिक जितेंद्र झेंडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "१० वर्षांचा काळ लहान नसतो. लोकांचा संयम आता संपला आहे. जर हा पूल सुरक्षित नसेल, तर तसे सांगा. आणि जर सुरक्षित असेल, तर तो तत्काळ सुरू करा," अशी मागणी त्यांनी केली आहे.

