Dailyhunt
Maharani Tararani | महाराणी ताराराणी जैन होत्या; आचार्य नयन पद्मसागर यांचा दावा, वादग्रस्त वक्तव्याने वादंग.

Maharani Tararani | महाराणी ताराराणी जैन होत्या; आचार्य नयन पद्मसागर यांचा दावा, वादग्रस्त वक्तव्याने वादंग.

औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या ताराराणी जैन असल्याचा दावा…

कोल्हापूर : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने वादंग निर्माण झाला आहे. 'महाराणी ताराराणी जैन होत्या', असे वक्तव्य केल्याने पद्मसागर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित जैन समूदायाच्या कार्यक्रमात बोलताना मंगळवारी त्यांनी हे वक्तव्य केले. पद्मसागर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले असून, इतिहास अभ्यासक आणि राजकीय नेत्यांनी पद्मसागर यांना खडेबोल सुनावले आहेत.

'औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूत्र संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले. लोकांना गरम तेलात टाकण्यात आले. अशा काळात एक जैन महिला राणीचा उदय झाला. महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाचा पराभव करण्याचा निर्धार केला. औरंगजेबाचा पराभव करण्याचे काम एका जैन राणीने केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे', असे जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

विनाकारण वाद निर्माण करू नयेत : संभाजी छत्रपती

माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना विनाकारण वाद निर्माण करू नये, अशा शब्दात मुनींना सुनावले. महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय असल्याचेही त्यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीर संस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत', असे संभाजी छत्रपतींनी म्हटले आहे.

महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असे वाटणे गैर नाही: इंद्रजीत सावंत

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असे वाटणे गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असे वक्तव्य करू नये', असे इंद्रजीत सावंत म्हणाले.

मोदी आल्यानंतर भारत झाला स्वतंत्र : आचार्य नयन पद्मसागर

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले. मोदी आल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला, असेही वक्तव्य पद्मसागर यांनी केले. मोदींनी राम मंदिर निर्माण करुन हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा ते काम करत आहेत, असे पद्मसागर म्हणाले.

महाराजांनी आपल्या भक्तांमध्ये आणि जनतेमध्ये चुकीची माहिती पोहचवू नये. आपल्याला काही ऐतिहासिक संदर्भ गरजेचे असतील तर आम्ही पुरवू.
- विक्रमसिंह मोहिते, मोहिते घराण्याचे सदस्य

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror