मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते.
मात्र, सभागृहाची परंपरा आणि सर्वानुमते निवड व्हावी, या भूमिकेतून महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती आणि विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित होते.
विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. तरीही संसदीय परंपरा जपण्याच्या उद्देशाने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात घोषणा करत, "सभागृहाची इच्छा सर्वानुमते निवड व्हावी अशी आहे. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत," असे सांगितले. त्यानंतर सभागृहात आवाजी मतदान घेण्यात आले आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
'सचिन अहिर निर्भीड, न्याय देणारे उपसभापती ठरतील' : देवेंद्र फडणवीस
सचिन अहिर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, "सचिन अहिर यांच्या निवडीबद्दल विरोधी पक्षाचेही आभार मानतो. त्यांनी सभागृहाची परंपरा जपत उमेदवारी मागे घेतली." फडणवीस यांनी १९९९ सालच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, "मी आणि सचिन अहिर एकाच वर्षी प्रथमच विधानसभेत निवडून आलो होतो. 'अहिर' या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. माझा त्यांच्याशी अनेक वर्षांचा परिचय असून ते अत्यंत निर्भीडपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत." ते पुढे म्हणाले, "उपसभापतीपदावर बसल्यानंतर प्रत्येक सदस्याला समान न्याय द्यावा लागतो. सचिन अहिर ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडतील, असा मला विश्वास आहे."
नीलम गोऱ्हेंचाही केला गौरव
मुख्यमंत्र्यांनी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कामाचाही गौरव केला. "संघर्षाच्या काळातही त्यांनी सभागृहाचे कामकाज अत्यंत प्रभावीपणे चालवले. प्रसंगी कठोर भूमिका घेत सभागृहाची प्रतिष्ठा जपली," असे फडणवीस म्हणाले. कामगार चळवळीतून घडलेले नेतृत्व सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मिल कामगार संघटनेतील कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. १९९९ मध्ये प्रथम आमदार झाले आणि त्यानंतर सलग तीन वेळा विधानसभेत निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. अभ्यासू मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. एखादा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला की 'काय अपेक्षा आहे?' असे विचारून तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा," अशी आठवणही त्यांनी सांगितली. फडणवीस यांनी त्यांच्या प्रसिद्ध दहीहंडी उत्सवाचा आणि सामाजिक कार्याचाही उल्लेख करत, "योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे," असे म्हटले. तसेच त्यांनी एक राजकीय मुद्दाही उपस्थित केला. "सचिन अहिर जेव्हा विधान परिषदेत आले, तेव्हा ते धनुष्यबाण चिन्हावरच आले होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी पक्ष बदललेला नाही," असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'एक सचिन निवृत्त झाला, दुसरा मैदान गाजवायला सज्ज' : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या खास शैलीत सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची शैली वेगळी असते. टीममध्ये ऑलराऊंडर खेळाडू असले तरी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात." यानंतर त्यांनी क्रिकेटची उपमा देत म्हटले, "त्यांच्या नावातच सचिन आहे. एक सचिन (तेंडुलकर) देशाचं नाव उज्ज्वल करून निवृत्त झाला. आता दुसरा सचिन पॅड बांधून नव्या इनिंगसाठी मैदानात उतरला आहे आणि मैदान गाजवायला सज्ज आहे."

