पुणे : गेल्या आठवड्यात पुण्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता. मात्र, आता भारतीय हवामान विभागाने पुढील ४-५ दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, येत्या काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाजही देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की,'पुढील ४-५ दिवसांत पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान पुढील दोन दिवस सामान्य राहील, त्यानंतर त्यात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल.'
रविवारी पुण्यात कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळी आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील, तर दुपार आणि संध्याकाळच्या वेळी अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० एप्रिलनंतर पाऊस पडणार का, या प्रश्नावर सानप म्हणाले, "याबाबत आताच सांगता येणार नाही. ४-५ दिवसांनंतर कोणती हवामान प्रणाली तयार होते, यावर ते अवलंबून असेल."
हवामान विभागानुसार, ९ एप्रिलनंतर शिवाजीनगरमध्ये तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क सारख्या भागात ते ३८-३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. राज्यातील स्थिती रविवारी राज्यात सोलापूर येथे सर्वाधिक ३७.९ अंश सेल्सिअस, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तापमान ३३-३७ अंशांच्या दरम्यान होते, तर कोकण-गोवा भागात ते ३१-३२ अंशांच्या आसपास राहिले. मराठवाड्यात ३६ आणि विदर्भात ३७ अंशांच्या आसपास तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे विदर्भातील तापमानात घट झाली आहे. यवतमाळ आणि अकोला सारख्या ठिकाणी तापमान ४० अंशांवर पोहोचले होते. मात्र, येत्या ४-५ दिवसांत संपूर्ण राज्यात कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे.'
विविध केंद्रांवरील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
(केंद्र, कमाल तापमान, किमान तापमान)
शिवाजीनगर : ३३.७, २०.४
लोहगाव : ३६.१, २२.०
चिंचवड : ३२.८, २१.४
लवळे : ३३.४, १८.०
एनडीए : ३२.८, १७.३
अचानक बदलांमुळे वाढते फ्लूची शक्यता
आरोग्याची विशेष काळजी घ्या आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजय नटराजन म्हणाले, 'हवामानातील अशा अचानक बदलांमुळे फ्लूची शक्यता वाढते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते.'पुणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण न केल्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम अद्याप बाकी आहे. यामुळे पाणी साचून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

