लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठी रंगभूमीवर येणाऱ्या नवीन नाटकांच्या यादीतील 'आता थांबवायचं कसं?' या नाटकाने रसिकांचे लक्ष वेधले आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक हे ३० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.
या नाटकाद्वारे सुकन्या मोने १० वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत.
गिरीश आणि सुकन्या या जोडीचे ३० वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर आलेले 'कुसुम मनोहर लेले' नाटक चांगलेच गाजले. त्यानंतर 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत पुन्हा दोघे एकत्र दिसले. त्यानंतर या नाटकात पुन्हा सुकन्या आणि गिरीश यांची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे.
२०१४ मध्ये रंगभूमीवर आलेल्या 'सेल्फी' या नाटकानंतर सुकन्या थेट रसिकांना भेटणार आहेत. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संदीप दंडवते यांनी केले असून, निर्मिती प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, भरत ठक्कर यांची आहे.
गिरीश म्हणाले की, 'सुकन्यासोबत पुन्हा काम करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यात मी एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमिकेत आहे, जो दोन मुलांचा पिताही आहे. नाटकाचा विषय संवेदनशील आहे. एखाद्या माध्यमाचा बेधुंदपणे वापर झाल्यास कोणत्या प्रकारचे संकट समोर उभे ठाकू शकते आणि त्यावर कशा प्रकारे मात करायला हवी, याची गोष्ट नाटकात आहे.
अशा प्रकारच्या संकटात अडकलेल्या आई-वडिलांना कोणती भूमिका घ्यायची आणि बेधुंद वागणाऱ्या पिढीने कशा प्रकारे जागरूक राहायला हवे हे नाटकात पाहायला मिळेल. अटल करंडक एकांकिका स्पर्धेत परीक्षक असताना या विषयावरील एकांकिका पाहून मी हादरून गेलो होतो. आता त्यावर हे नाटक येत आहे.'
'मध्यमवर्गीय आईची भूमिका आव्हानात्मक'
नाटकाची संहिता भावल्याने सुकन्या यांनी १० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करण्याचे ठरवले. त्या म्हणाल्या की, 'कुसुम मनोहर लेले' नाटक आणि 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेनंतर गिरीशबरोबर पुन्हा काम करणे माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. आम्हा दोघांचे 'गिव्ह अँड टेक' इतके सहज आहे की आम्हाला संवादांचीही गरज पडत नाही.

