नवी दिल्ली - सध्या राजधानी दिल्लीची हवा प्रदूषित होत असताना नेमकं त्याच वेळी दिल्लीत भारत-बांग्लादेश टी20 मालिका खेळली जाणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतली प्रदुषणाची वाढती समस्या आणि हवेची खालावलेली पातळी पाहता, सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने हा सामना ठरवलेल्या वेळेनुसारच होईल असं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा जोरदार भडकली आहे. दियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बीसीसीआयच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. 'परिस्थितीचा अंदाज असतानाही, बीसीसीआय हा सामना खेळवण्यावर ठाम आहे, ही भूमिका चीड आणणारी आहे'.
उद्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार असून, सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

