Chickpea Water: सध्या आरोग्याशी संबंधित अनेक घरगुती उपाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे उकडलेल्या हरभऱ्याचे किंवा आंबवलेल्या (फर्मेंटेड) हरभऱ्याचे पाणी. हे पाणी पिण्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचन चांगले होते आणि शरीराला अनेक फायदे मिळतात, असा दावा केला जात आहे.
मात्र, हे दावे कितपत खरे आहेत? याबाबत उपलब्ध संशोधन काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
भारतीय स्वयंपाकघरात हरभऱ्याचा वापर नेहमीच केला जातो. छोले, उसळ किंवा इतर अनेक पदार्थांसाठी हरभरे उकडले जातात. मात्र, हे हरभरे उकडल्यानंतर उरलेले पाणी बहुतेक वेळा फेकून दिले जाते. आता हेच पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे.
विशेषतः आंबवलेल्या हरभऱ्याच्या पाण्याला ‘फर्मेंटेड चिकपी वॉटर’ म्हणून ओळखले जाते. हे पाणी आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना (गुड बॅक्टेरिया) मदत करू शकते, असे काही अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आले आहे. फर्मेंटेशन प्रक्रियेदरम्यान तयार होणारे काही लाभदायक जीवाणू आणि पोस्टबायोटिक घटक पचनसंस्था अधिक सक्षम बनवण्यास मदत करू शकतात. मात्र, हे फायदे प्रत्येक व्यक्तीला समान प्रमाणात मिळतील, असे ठोस वैज्ञानिक पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत.
काही संशोधनांनुसार, फर्मेंटेशननंतर या पाण्यात लॅक्टोबॅसिलससारख्या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते. यामुळे त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म वाढू शकतात. तसेच शरीराला अन्नातील पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होऊ शकते. काही संशोधकांच्या मते हे पाणी पोस्टबायोटिकप्रमाणे काम करून आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
हरभऱ्याच्या पाण्यात काही प्रमाणात विरघळणारे प्रथिने, स्टार्च, सॅपोनीन, विरघळणारी कर्बोदके आणि काही अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. मात्र, संपूर्ण उकडलेल्या हरभऱ्याच्या तुलनेत या पाण्यात प्रथिने आणि तंतुमय घटक (फायबर) खूपच कमी असतात. त्यामुळे केवळ हे पाणी पिण्यापेक्षा उकडलेले हरभरे खाणे अधिक पौष्टिक मानले जाते.
काही लोकांचा असा अनुभव आहे की हरभऱ्याचे पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते, शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया सुधारते. तसेच आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यासही त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, उपलब्ध संशोधनानुसार संपूर्ण उकडलेले हरभरे अधिक फायदेशीर आहेत. कारण त्यामध्ये भरपूर फायबर आणि रेसिस्टंट स्टार्च असते, जे पचनसंस्थेसाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अधिक उपयुक्त मानले जाते.
हरभऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी काही लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये. ज्यांना कडधान्यांची अॅलर्जी आहे, त्यांनीही हे पाणी टाळावे. तसेच मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण किंवा विशेष वैद्यकीय आहार पाळणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच याचा आहारात समावेश करावा.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हरभऱ्याचे पाणी हे चमत्कारिक औषध नाही. ते संतुलित आहाराचा एक भाग असू शकते, मात्र केवळ त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी तंतुमय आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांना अधिक महत्त्व आहे.
म्हणूनच, उकडलेल्या किंवा आंबवलेल्या हरभऱ्याच्या पाण्याचे काही संभाव्य फायदे असले तरी त्याबाबत अजून व्यापक वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे. त्यामुळे कोणताही नवीन आहाराचा ट्रेंड आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि संतुलित आहाराला प्राधान्य देणे अधिक योग्य ठरेल.

