First Mobile Call: आज मोबाईल फोन प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला असला, तरी भारतातील मोबाईल क्रांतीची सुरुवात 31 जुलै 1995 रोजी झाली. याच दिवशी देशातील पहिला मोबाईल फोन कॉल करण्यात आला आणि भारतीय दूरसंचार क्षेत्राने नव्या युगात प्रवेश केला.
31 जुलै 1995 रोजी तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता येथून तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना नवी दिल्ली येथे मोबाईलवरून कॉल केला. भारताच्या इतिहासातील हा पहिला अधिकृत मोबाईल कॉल मानला जातो. हा कॉल मोदी टेल्स्ट्रा (Modi Telstra) या कंपनीच्या नेटवर्कवरून करण्यात आला होता.
या ऐतिहासिक कॉलने भारतातील मोबाईल सेवांचा पाया रचला. त्या काळात मोबाईल फोन ही अत्यंत महागडी सुविधा होती. हँडसेटची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती, तर कॉलचे दरही खूप जास्त होते. विशेष म्हणजे, कॉल करणाऱ्या आणि कॉल स्वीकारणाऱ्या दोघांनाही शुल्क भरावे लागत असे. त्यामुळे मोबाईलचा वापर प्रामुख्याने उद्योगपती, व्यावसायिक आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांपुरताच मर्यादित होता. (First Mobile Call)
त्यानंतरच्या काळात दूरसंचार क्षेत्रात मोठे बदल झाले. खासगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढली आणि कॉलचे दर कमी झाले. 2G, 3G, 4G आणि आता 5G तंत्रज्ञानामुळे मोबाईल सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. स्मार्टफोनच्या आगमनानंतर मोबाईल हा केवळ संवादाचे साधन न राहता शिक्षण, बँकिंग, मनोरंजन, आरोग्य सेवा आणि डिजिटल व्यवहारांचे महत्त्वाचे माध्यम बनला. (First Mobile Call)
आज भारत हा जगातील सर्वात मोठ्या मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्या देशांपैकी एक आहे. डिजिटल इंडिया, यूपीआय आणि ऑनलाइन सेवांच्या वाढत्या वापरामुळे देशाच्या डिजिटल परिवर्तनात मोबाईलची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे. (First Mobile Call)
31 जुलै 1995 रोजी झालेला तो पहिला मोबाईल कॉल हा केवळ दोन नेत्यांमधील संवाद नव्हता, तर भारताच्या डिजिटल भविष्याची नांदी होती. तीन दशकांनंतरही हा दिवस भारतीय दूरसंचार इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून स्मरणात आहे.

